नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन वर्षांपूर्वी जेव्हा कसोटी सामन्यात भारतीय संघात पदार्पण केले तेव्हाच मला दडपण काय असते याची जाणीव झाली, अशा शब्दात भारतीय संघाचा मधल्या फळीतील नवोदित फलंदाज मयांक आग्रवाल याने आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्रा याच्याशी एका चॅटशोमध्ये तो बोलत होता.
कोणत्याही खेळाडूसाठी कसोटी पदार्पणाचा सामना हा नेहमीच संस्मरणीय असतो. 2018 साली बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आलो त्याच क्षणी दडपण काय असते याची जाणीव झाली.
माझ्याकडून धावा झाल्या नाहीत तर मला पुन्हा संघात संधी मिळणार नाही असेच वाटत होते. मात्र, पहिले काही चेंडू खेळल्यावर आत्मविश्वास वाढला, असेही मयांक म्हणाला. संघात स्थान मिळाल्यावर जास्तीत जास्त धावा कशा करता येतील हाच विचार मनात सुरू होता, असेही त्याने सांगितले.