उत्तम पिंगळे
दोन आठवड्यांपूर्वी शाळेच्या मॉनिटर निवडणुकीचा अंतिम निर्णय अजूनही दिसलाच नाही. आपण पाहिले होतेच सर्वात जास्त मते कमळापूरकर 10, धनुर्धारी 6, घड्याळपाटील 5 व हातगावकर 4 तसेच इतर चारजणांना प्रत्येकी एक मत मिळाले होते. मास्तरांनी आपापला निर्णय घ्यावा असे सांगूनही कोणी पुढे येईना. तसेच कमळापूरकर व धनुर्धारी यांच्यात आधी मैत्री होती व तसे त्यांनी वर्गात बोलूनही दाखवले होते. पण त्या दोघांच्यात आता नवीन काही कारणांमुळे धुसफूस सुरू होती.
त्याचे मुख्य कारण होते की मॉनिटरने नंतर वर्गात सचिव नेमायचे ते निम्मे कमळापूरकरचे मित्र असावे व निम्मे धनुर्धारीचे जसे होमवर्क सचिव, क्रीडा सचिव, युनिफॉर्म सचिव, विद्यार्थी सोसायटी सचिव असे अनेक.त्याच प्रमाणे मॉनिटर पदही एकेक टर्म दोघांनी वाटून घ्यावे हा मुख्य हेतू होता. पण त्याच कारणावरून या दोघांच्यात चांगलीच जुंपली आहे.त्यातच धनुर्धारीच्या एका मित्राला चांगलाच “ऊत’ आला होता त्यामुळे कुठे तडजोडीची शक्यता होत होती तेथे पुन्हा खोडा घातला जात असे. वर्गातील मुलांना त्यामुळे दोघांचे नक्की सख्य आहे की नाही हाच मोठा प्रश्न पडला होता.
त्यातच धनुर्धारीने सांगितले की कमळापूरकरला जास्त मते असल्यामुळे त्यांनी मास्तरांना भेटून मी प्रयत्न करतो असे सांगावे त्यामुळे गोंधळ अजून वाढला. त्यातच कमळापूरकरचाही मित्र “वारंवार’ “मानगुटीवर’ बसल्यागत तेच तेच घोषवाक्य बोलत पुन्हा होऊ घातलेल्या प्रयत्नावर पाणी पडत होता. अगदी शेवटी घड्याळ पाटलानेही सांगितले की, कमळापूरकर व धनुर्धारी आपण दोघेही मित्र आहात तेव्हा आपण दोघांनी एकत्र जाऊन मास्तरांना सांगून ही मॉनिटर पदाची कोंडी सोडवावी, आमच्यापाशी एवढे मित्रगण सध्या तरी नाहीत. शेवटी मास्तरांनीच सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलावले.
मास्तर सांगू लागले, तुम्हाला माहीत आहे का की आपल्या शाळेच्या बलभीम व्यायामशाळेच्या जागेत वाद कित्येक वर्षे सुरू होता. आता त्यावर तोडगा निघून ती जागा आपल्या शाळेला मिळाली आहे. तसेच त्या चिनार शाळेला विशेष दर्जा होता. त्या शाळेच्या मुलांना आपल्या शाळेत प्रवेश मिळायचा पण आपल्या शाळेतील मुलगा तेथे प्रवेश घेऊ शकत नसे. इतरही अनेक विशेष सवलती होत्या. परंतु आता शिक्षण विभागाने त्या बंद केल्या आहेत.
असे केल्याने ती शाळाही आता शिक्षण विभागाच्या अखात्यारीत आलेली आहे. आता आपले विद्यार्थीही त्या शाळेत प्रवेश घेऊ शकतात. आता त्या शाळेचा विशेष दर्जा जाऊन आपल्या प्रमाणेच सामान्य शाळा झालेली आहे त्यामुळे शिक्षण खात्याचे सारे नियम तेथे लागू झालेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो सांगायचा मुद्दा हा की खरोखरच इच्छा असेल व स्वार्थ नसेल तर मार्ग निघू शकतो. समस्या कितीही किचकट असली तरी एक मार्ग निश्चितच असतो तो फक्त शोधावा लागतो. तरी आपण सर्वांनी एकत्रपणे पुन्हा विचार करून नक्की मॉनिटर कुणाला बनवावे ते ठरवावे.
माझ्याकडील पर्यायानुसार ज्याला जास्त मते मिळाली आहेत म्हणजे कमलापूरकर याला मी आता सांगतो की तू पुढे ये व काही दिवसांची मुदत घेऊन नक्की तुझ्याबरोबर कोण कोण आहेत त्यांना तुझ्यासोबत घेऊन ये. सत्वर कमळापूरकर म्हणे. मला 10 मते असली तरी अजून कुणी मला पाठींबा दिला नाही म्हणून आपण इतर कुणालाही सांगावे. आता मास्तर इतरांकडे वळले आहेत.