नागपूर: बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत पुन्हा अपयशी ठरला मात्र, लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी पंतची बाजु उचलुन धरली आहे. अपयशी होत असल्यामुळे टीका होणारच आहे. पण त्याला आणखी संधी दिली पाहिजे, असे गावसकर म्हणाले.
क्रिकेटमध्ये दोन थॅंकलेस जॉब असतात. त्यातील एक पंच तर दुसरा यष्टीरक्षक. पंचाचे 10 पैकी 9 निर्णय बरोबर असतील आणि एक चुकीला तर लगेच त्याच्यावर टीका सुरु होते. तसेच यष्टीरक्षकाच्या बाबतीत घडते, असे सांगताना गावसकर यांनी पंतला थोडा वेळ द्या तो निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वासही गावसकर यांनी व्यक्त केला.
क्रमवारीत कोहलीची घसरण
बांगलादेश विरोधातल्या मालिकेत रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या (आयसीसी) टी-20 क्रमवारीत झेप घेतली आहे. त्याचवेळी भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीची घसरण झाली असून त्याला पहिल्या दहा खेळाडूंमध्येही स्थान राखता आलेले नाही.
क्रमवारीत रोहित 8 व्या स्थानावरून सातव्या स्थानावर आला तर, लोकेश राहुल 9 व्या स्थानावरून 8 व्या स्थानावर आला आहे. दहाव्या स्थानावर असलेला कोहली आता 15 व्या स्थानावर गेला आहे.