फिरोजाबाद : बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने 14 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. आग्रा लखनौ द्रुतगती मार्गावर बुधवारी रात्री हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. जखींना वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नागरा खानघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात रात्री दहाच्या सुमारास घडला. बिहारमधील मोतीहारीकडे दिल्लीतून प्रवासी घेऊन जाणारी डबल डेकर बस ट्रकला धडकली. बसमध्ये 50 प्रवासी होते, असे पोलिस अधिक्षक राजेश कुमार यांनी सांगितले.
या अपघातानंतर आपण बेशुध्द पडलो, असे इटवाहमध्ये रुग्णालयात दाखल झालेल्या एका जखमीने सांगितले. ते म्हणाले, मला शुध्द आली त्यावेळी सर्व काही तुटलेले दिसत होते. मी बसच्या वरच्या मजल्यावर झोपलो होतो. अपघातानंतर मला रुग्णवाहीकेतून आणण्यात आले. सर्व प्रवासी बिहारमधील होते. माझ्या शेजारच्या आसनावर झोपलेल्या प्रवाशाचे काय झाले ते मला समजले नाही, असे त्याने सांगितले.
दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व जखमींवर योग्य उपचार होतील, याची काळजी घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले ाहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या अपघातात मरण पावलेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.