तिरुपती – साखरपुड्यासाठी वऱ्हाड्यांना घेऊन निघालेली बस जवळपास शंभर फुट खोल दरीत कोसळली. आंध्र प्रदेशातील चित्तुर जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. तर 45 जण जखमी झाले.
आंध्र प्रदेशातील चित्तुर जिल्ह्यात 50 हून अधिक वऱ्हाड्यांना घेऊन निघालेली बस जवळपास 100 फुट खोल दरीत कोसळली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तिरुपतीपासून 25 किमीवरील बकरापेटा येथे ही दुर्घटना घडली. तिरुपतीच्या पोलीस अधीक्षकांनी या अपघाताची माहिती दिली. मृतांमध्ये मुलं आणि महिलांचा समावेश आहे. रविवारी सकाळी साखरपुडा होता. त्यासाठी हे सर्व जण तिरुपतीकडे जात होते. अतिवेगामुळं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि ती खोल दरीत कोसळली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि इतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. आंध्र प्रदेश सरकारनं अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 2 लाख रुपये भरपाई दिली जाणार आहे.