केपटाऊन – यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने नाबाद शतकी खेळी केली. मात्र, यानंतरही विराट कोहलीचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक फलंदाजीमुळे भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचेच लक्ष्य ठेवता आले.
आपला दुसरा डाव सुरु केल्यावर तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 2 गडी गमावून 101 धावा केल्या आहेत. या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी आता त्यांना 111 धावांची गरज आहे. सामन्याचे अद्याप 2 दिवस बाकी आहेत.
पंतच्या शतकानंतरही भारताचा दुसरा डाव केवळ 198 धावांवर आटोपला. पंतनंतर कोहलीच्या 29 तर लोकेश राहुलच्या 10 धावांचा अपवाद वगळता अन्य एकाही फलंदाजाला दोनअंकी धावा करता आल्या नाहीत. भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 57 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर चेतेश्वर पुजारा 9 धावा काढून परतला. त्याने कोहलीला साथ देत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेने पुन्हा एकदा निराशा केली. यावेळी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने कोहलीला साथ देत संघाचा डाव सावरला. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 94 धावांची भागीदारी केली.
दरम्यान पंतने आपले अर्धशतक साकार केले. कोहली अनावश्यक पद्धतीने फटका मारून बाद झाला. पंतने आक्रमक फलंदाजी केली. संघाच्या 152 धावा असताना भारताचे 5 फलंदाज बाद झाले होते. संघाचे 9 गडी बाद झाले असताना पंतने आपले शतक पूर्ण केले. जेन्सनने जसप्रीत बुमराहलाबाद करत भारताचा डाव 67.3 षटकात 198 धावांवर रोखला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेन्सनने 4 गडी बाद केले. तर कागिसो रबाडा व लुंगी एन्जीडी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
दक्षिण आफ्रिकेने दुसरा डाव सुरु केल्यावर महंमद शमीने एडन मार्करमला परतवले. त्यानंतर कर्णधार डीन एल्गरने किगन पीटरसनच्या साथीत डाव सावरला व संघाचे शतक फलकावर लावले. जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर एल्गर 30 धावांवर बाद झाला व पंचांनी दिवसाचा खेळ थांबवला. पीटरसन 48 धावांवर खेळत आहे. भारताकडून शमी व बुमराहने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव – 223 धावा. दक्षिण आफ्रिका पहिला डाव – 210 धावा. भारत दुसरा डाव – 67.3 षटकांत सर्वबाद 198 धावा. (ऋषभ पंत नाबाद 100, विराट कोहली 29, लोकेश राहुल 10, अवांतर 28, मार्को जेन्सन 4-36, लुंगी एन्जीडी 3-21, कागिसो रबाडा 3-53). दक्षिण आफ्रिका दुसरा डाव – 29.4 षटकांत 2 बाद 101 धावा. (डीन एल्गर 30, एडन मार्करम 16, किगन पीटरसन खेळत आहे 48, महंमद शमी 1-22, जसप्रीत बुमराह 1-29).
शार्दुलने टाकले सात चेंडूंचे षटक
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 50 व्या षटकात पंचांकडून एक चूक झाली. शार्दुल ठाकूर हे षटक टाकत होता. या षटकात भारताला पाच धावांची पेनल्टी लागली तेच पंचांच्या चुकीमुळे शार्दुलच्या एका षटकात सहाऐवजी सात चेंडू टाकावे लागले. कर्णधार विराट कोहलीने शार्दुलकडे चेंडू सोपवला. शार्दुलने गोलंदाजी करताना त्या षटकात सात धावा दिल्या आणि या षटकात सहाऐवजी सात चेंडू टाकले. चेंडू मोजण्यात पंचांची चूक झाली.