दुबई – भारतीय क्रिकेट संघाला जसप्रीत बुमराहच्या रुपाने एक अत्यंत हुशार, गुणवान वेगवान गोलंदाज गवसला आहे. तो सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वप्नवत कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीचा पुरेपूर अभ्यास करण्याची संधी विनाकारण उपलब्ध करुन देऊ नये म्हणूनच त्याने इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली तरी ती नाकारावी, असा सल्ला पाकिस्तानचा सुलतान ऑफ स्विंग वसिम अक्रम याने दिला आहे.
भारतीय संघात जेव्हा बुमराहने पदार्पण केले तेव्हापासून त्याच्या हायआर्म ऍक्शनचे अनेकांना आश्चर्य वाटले होते. हा फार काळ जागतिक क्रिकेटमध्ये टिकणार नाही असेही बोलले गेले. मात्र, त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचा अंदाज खोटा ठरवला. आज तो जगातील सर्वात भेदक गोलंदाज आहे. सध्या सर्वात जास्त क्रिकेट भारतीय संघ खेळतो. सातत्याने सामने तसेच मालिका होतात त्यामुळे खेळाडूंना विशेषतः गोलंदाजांना विश्रांतीच मिळत नाही. त्यामुळे बुमराहने त्यात कौंटी खेळून भर घालु नये, असे मतही अक्रमने व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आज बुमराह असा एकमेव गोलंदाज आहे की तो क्रिकेटचे तिनही प्रकारचे सामने खेळतो. कसोटी, एकदिवसीय व टी-20 या सामन्यांचा गेल्या पाच वर्षांत अतिरेक झाला आहे. भारतीय संघाचे वेळापत्रक अभ्यासले तर दोन मालिकांमध्ये देखील जास्त विश्रांती मिळत नाही, त्यामुळे आंतरराष्ट्रीय लढतींचा व्यस्त कार्यक्रम पाहता त्याने कौंटी स्पर्धेत सहभाग घेतला तर त्याची कारकीर्द लवकर संपुष्टात येईल, तसेही वेगवान गोलंदाजांनी कारकीर्द फलंदाजांपेक्षा छोटी असते, असेही अक्रम म्हणाला.
भारतीय संघात निवड झाल्यापासून त्याने खूप कमी काळात संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून नावारुपाला येण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याची गोलंदाजी करण्याची शैली इतकी अनाकलनिय आहे की त्याचे चेंडू फलंदाजाला रिडच करता येत नाहीत. आऊटस्विंग आणि इनस्विंग चेंडूंचा अंदाज लावणे फलंदाजांना खूपच कठीण जाते. भारतीय संघाला असा गोलंदाज खूप काळानंतर मिळला आहे. त्याला सातत्याने गोलंदाजी टाकायला लावण्यापेक्षा त्याचा अस्त्र म्हणून वापर केला पाहिजे. गोलंदाजीचा भार टाकण्यापेक्षा त्याला जितके ताजेतवाने ठेवता येइल याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही अक्रम म्हणाला.
यॉर्करकिंग….
बुमराहचे हुकमी अस्त्र म्हणजे यॉर्कर चेंडू आहे. तो डावाच्या सुरवातीपेक्षा अखेरच्या षटकात असे यॉर्कर टाकतो की मलादेखील त्याच्या या क्षमतेचे कौतुक वाटते. अनेक गोलंदाज यॉर्कर टाकताना वारंवार यशस्वी होत नाहीत मात्र, बुमराहला ही देणगीच मिळाली आहे की तो त्याला वाटेल तेव्हा यॉर्कर टाकू शकतो. ही कला त्याने जोपासली पाहिजे तरच तो येत्या काळात केवळ भारतीय संघाचाच नव्हे तर जागतिक क्रिकेटचा महान गोलंदाज बनलेला आपल्याला दिसेल, असेही अक्रमने व्यक्त केले.