बुलढाणा : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे बस घसरली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बसने पेट घेतल्याने या २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मात्र अपघात होण्यासाठी रस्त्यामधील दुभाजक कारण ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेत बसचा डिझेल टँक फुटला आणि बसला आग लागली. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला.
Maharashtra | Several feared dead after a bus burst into flames on Samruddhi Mahamarg expressway in Buldhana: Buldhana Police pic.twitter.com/Zs6Mt0tfsT
— ANI (@ANI) July 1, 2023
दरम्यान, बस दुभाजकाला धडकली त्यावेळी समोरचा एक्सेल तुटला होता. समोरची चाक बस पासून वेगळी झाली होती. त्यानंतर आग लागली. या घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर काही प्रवाशांनी काचा फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र बस सर्वात आधी नागपूरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उजवीकडे एका लोखंडी पोलला धडकली.
बस अनियंत्रित होऊन पुढं जाऊन येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही लेनच्या मध्ये असलेल्या काँक्रिटच्या दुभाजकाला धडकली आणि पलटली. बस पलटी होताना डाव्या बाजूने पलटली. त्यामुळं बसचे दार खाली दाबले गेले. त्यामुळं लोकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता.