Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा येथे डिव्हायडरवर आदळल्याने बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर चालकासह आठ जणांचे प्राण वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस पलटी झाली तेव्हा चालक आणि काही प्रवाशांनी बसच्या खिडक्या फोडल्या आणि बसमधून बाहेर पडले. हा अपघात इतका भयानक आहे की, मृत प्रवाशांची ओळख पटणे अवघड झाले आहे.
या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली. बसमध्ये 25 प्रवाशांचे मृतदेह पडलेले होते. सर्व मृतदेह जळालेले होते. अनेक मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेले होते. एकाही व्यक्तीचा मृतदेह ओळखता येणे शक्य नव्हते. हे बसमधील दृश्य पाहून अग्निशमन दलाचे जवानही हादरून गेले. बस अक्षरश: जळून खाक झाली. बसच्या सर्वच सीट आणि प्रवाशांचे सामानही जळून खाक झाल्याने काहीच उरलेलं नाही. घटनास्थळी फक्त कोळसाच उरला आहे.
नेमका अपघात कसा घडला?
नागपूरहून पुण्याकडे विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस निघाली होती. मध्यरात्री 1.30च्या सुमारास समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा येथे बस डिव्हायडरला धडकली आणि बस पलटी झाली. बस पलटी झाल्याने दरवाजाही तुटला. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडणे अशक्य झाले, त्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. आग लागल्यानंतर प्रवाशांनी जीव वाचवण्यसााठी आक्रोश केला पण यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला.
या अपघातून 8 जण वाचले, पण आपल्यासमोरच बस पेटलेली असताना आणि प्रवासी होरपळत असताना त्यांच्याकडे प्रवाशांना वाचवण्याची काहीच साधने नसल्याने काही मदत करणे शक्य झाले नाही. त्यात रात्रीच्या वेळी हा अपघात घडल्याने मदत कार्यात अडथळा येत होता. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होते.