बुलडाणा : जिल्हयात माहे 01 जून 2021 ते 24 ऑक्टोबर 2021 या कालावधीत एकुण 90 महसूल मंडळा पैकी 53 महसूल मंडळात (65 मि.मी पेक्षा जास्त पर्जन्यमान) अतिवृष्टी झाली. तसेच जिल्ह्यात या कालावधीत बऱ्याच भागात सततचा पाऊस पडत होता. त्यामुळे नदी, नाला व ओढे यांना पुरही आले. परिणामी, नदीकाठच्या शेतात पाणी साचून किंवा शेतातील पाण्याचे निचरा न झाल्यामुळे तसेच पुराचे पाणी शेतात घुसल्यामुळे देखील शेती पिकाचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत यंत्रणांनी पंचनामे केले, तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे आदेश पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर व सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील सर्वच बाधित शेतीचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत यंत्रणांकडून सातत्याने आढावाही घेण्यात आला. त्यामुळे एक विशिष्ट तालुका, गाव, परिसरातील नुकसान ग्रस्त भागच पंचनामा करू नये, असे होवू शकत नाही. यासंदर्भात अपप्रचार केल्या जात असून खोटी माहिती देण्यात येत आहे. तसेच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा मदतीवर शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील कुणीही नुकसान ग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. शेतकरी बांधवांनी अशा खोट्या माहिती व अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीसाठी प्रशासना सोबत रहावे. प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहनही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.