मदत आणि पुनर्वसन कार्याचा आढावा
नवी दिल्ली: बुलबुल चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसाने ओडिशाच्या किनारपट्टीलगतच्या क्षेत्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टीलगतच्या 5 जिल्ह्यांमधल्या लागवडीखालच्या सहा लाख हेक्टरहून अधिक जमीनीवरचे सुमारे 40 टक्के पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती विशेष मदत आणि पुनर्वसन आयुक्त पी. के. जेना यांनी दिली आहे.
वादळी वाऱ्यांसह कोसळसलेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो घरांची पडझड झाली, असंख्य वृक्ष उन्मळून पडले आहेत, अनेक ठिकाणी वीजेचे खांब उखडले गेले, तर अनेक टॉवरचेही नुकसान झाल्याने दूरध्वनी सेवाही खंडीत झाली आहे.
बुलबुल चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या पश्चिम बंगालमध्ये, चक्रीवादळामुळे घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांत मरण पावलेल्यांची संख्या 10 वर पोचली आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यात 5, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात 2 तर, पूर्व मिदनापूर, पूर्व वर्धमान आणि कोलकत्ता जिल्ह्यातली प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
राज्यातल्या नऊ जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला असून, त्यामुळे सुमारे 4 लाख 65 लाखांहून अधिक लोकांचे जनजीवन बाधित झाले असल्याची माहिती पश्चिम बंगालचे राज्य आपत्ती व्यवस्थापनमंत्री जावेद खान यांनी दिली आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत “बुलबुल’ या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीनंतरच्या मदत आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेण्यात आला.
पश्चिम बंगालमध्ये 7 जण मृत्युमुखी पडले असून 1 लाख घरांचे आणि उभ्या पीकांचे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून दूरसंवाद सेवा लवकरच पूर्ववत होईल. ओदिशात 2 लाख हेक्टर वरच्या पीकाचे नुकसान झाले आहे. काही भागांचा अपवाद वगळता वीज आणि पाणी पुरवठा पूर्ववत झाला आहे. ज्या भागात परिस्थिती पूर्ववत झालेली नाही अशा ठिकाणचा पाणी आणि वीज पुरवठाही उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.
अन्नधान्य, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवांसह वीज, दळणवळण सुविधांसाठी केंद्रीय मदतीचे आश्वासन एनसीएमने दिले आहे.