मुंबई: महाराष्ट्रात शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला असून पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देण्यात आले आहे. फॅक्सव्दारे हे पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे २० वर्षानंतर महाराष्ट्रात आता शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे.
गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून चांगलाच गोंधळ सुरु होता. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला होता पण मंत्रिपदाच्या वाटपावरून या दोघांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेच सरकार येणार असल्याने सेनेला पाठिंबा देणाऱ्या सर्व अपक्ष आमदारांनी आनंद व्यक्त केला आहे.