नवी दिल्ली : सरकारने चालू आर्थिक वर्षात सरकारी कंपन्यांमधील भाग भांडवल विकून म्हणजेच निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 1 लाख 5 हजार कोटी रूपयांचा निधी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. सीतारामन म्हणाल्या की सध्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत विदेशी कर्जाचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी असून जगात हे प्रमाण सर्वात कमी आहे.
अंतरीम अर्थसंकल्पात निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून यावर्षी 90 हजार कोटी रूपये उभारण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. पण त्या उद्दीष्टात निर्मला सीतारामन यांनी वाढ केली आहे. सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील भाग भांडवल विकून देशाला निधी उभारणी करण्याचा सोपा मार्ग उपलब्ध आहे. त्यासाठी काळजीपुर्वक पावले टाकली जात आहेत. तोट्यात चालणारे सार्वजनिक उद्योग बंद करून त्यावर होणारा मोठा खर्चही वाचवण्याचा सरकारचा इरादा आहे. त्यासाठी जे उद्योग बंद करायचे आहेत त्यांची यादी तयार केली जात आहे.