नवी दिल्ली- “आगामी विधानसभा आणि 2024 ची लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी(बसपा) कोणत्याही राजकीय पक्षासोबत हातमिळवणी करणार नसून, स्वबळावरच या निवडणुका लढवणार आहे,’ अशी घोषणा बसपाच्या प्रमुख मायावती यांनी रविवार त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केली.
याशिवाय लखनऊ येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना मायावतींनी कॉंग्रेसवर संभ्रम निर्माण करत असल्याचाही आरोप केला. त्या पुढे म्हणाल्या की, “आमच्या पक्षाने उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आघाडीकरून निवडणूक लढवली मात्र परिणाम आणि अनुभव चांगला नव्हता. म्हणून आता बसपा स्वबळावरच निवडणूक लढवणार आहे. कॉंग्रेस आणि काही अन्य पक्ष आमच्यासोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र आमची विचारधारा ही अन्य पक्षांपेक्षा वेगळी आहे.’
बॅलेट पेपरद्वारे निवडणूक व्हावी –
यावेळी मायावतींनी मागणी केली की, आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत, त्या बॅलेट पेपरद्वारे व्हाव्यात. मागील काही वर्षांमध्ये ईव्हीएमद्वारे मतदान होत असल्याने लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे बसपाची निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडे ही मागणी आहे की, आगामी काळातील निवडणुका या बॅलेट पेपरद्वारे घेतल्या जाव्यात. ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड आहे, काहीजण त्यात खटपट करत आहेत. बॅलेट पेपरच्यावेळी आमच्या जागांची संख्या आणि सर्व मतांची टक्केवारी ही वाढलेली असायची. पुन्हा बॅलेट पेपरद्वारे मतदान घेणे आवश्यक आहे.