नवी दिल्ली – देशभरातील बीएसएनएल कर्मचाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने तीन कृषीविषयक कायदे त्वरित मागे घ्यावेत, असे आवाहनही बीएसएनएल एम्प्लॉईज युनियने केले आहे.
हे तिन्ही कायदे संसदेच्या गेल्या अधिवेशनात गैरमार्गाने संमत करण्यात आले आहेत. ते कायदे संमत करताना सरकारने लोकशाही प्रक्रिया पाळली नव्हती असाहीं आरोप त्यांनी केला आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा एमएसपीचा म्हणजेच किमान आधारभूत किंमतीचा अधिकार गमावला जाणार आहे त्यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, असे या कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.
उद्या दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या काळात सर्व बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी आपआपल्या कार्यालयांच्या बाहेर सरकारच्या विरोधात व शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निदर्शने आयोजित करावीत, असे आवाहन या संघटनेने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना केले आहे.