लंडन – भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावकमी करण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे.
खलिस्तानी वॉंटेड दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याच्या कॅनडाच्या आरोपानंतर ऋषी सुनक यांनी कायद्याच्या राज्याचा आदर करण्याच्या ब्रिटनच्या भूमिकेची पुष्टी केली.
त्यानंतचर दोन्ही नेत्यांनी या संदर्भात एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले असल्याचे डाऊनिंग स्ट्रीटच्या माध्यमातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सर्व देशांनी राजनैतिक संबंधांवरील व्हिएन्ना कन्व्हेन्शनच्या तत्त्वांसह सार्वभौमत्व आणि कायद्याच्या नियमांचा आदर केला पाहिजे, असे सुनक यांनी म्हटले आहे.
त्यांनी परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची आशा व्यक्त केली आणि पुढील चरणांवर पंतप्रधान ट्रूडो यांच्याशी संपर्कात राहण्याचे मान्य केले. निज्जरच्या हत्येमागे बारताचा हात असल्याची शक्यता ट्रुडो यांनी गेल्या महिन्यात संसदेत व्यक्त केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला.
दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. तर भारताने कॅनडाच्या तब्बल 41 अधिकाऱ्यांना परत पाठवण्याचा निर्णयही घेतला आहे.