सातारा -करोनाच्या जागतिक प्रसारास चीन कारणीभूत असल्याचा आरोप जगभरातून होत असल्याने तेथून बाहेर पडणारे उद्योगधंदे भारतात येण्यास तयार आहेत. जगभरातील मोठ्या उद्योगांना महाराष्ट्राचे आकर्षण नेहमीच राहिले आहे. राज्यात मोठमोठे उद्योग आणायचे सुतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले होते.
सातारा शहर व तालुक्याचा झपाट्याने विकास होण्यासाठी सातारच्या औद्योगिक वसाहतीतही तीन-चार मोठे उद्योग येण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी या मागणीचे निवेदन ईमेलद्वारे पाठवले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, चीनमधून बाहेर पडणारे अनेक मोठमोठे उद्योग भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. सातारच्या औद्योगिक वसाहतीतही त्यातील तीन-चार मोठ्या कंपन्या आल्या तरी सातारा शहर व तालुक्याचा विकास गतिमान होईल. शहरालगत देगाव, निगडी येथे नवीन एमआयडीसी मंजूर आहे. तेथे डोंगराच्या पायथ्याशी पडीक व माळरान जमीन मोठ्या उद्योगांसाठी उपलब्ध होईल. भूसंपादनात शेतजमीन न घेता नापीक, पडीक जमीन घ्यावी.
जे शेतकरी स्वेच्छेने जमीन देतील, ती संपादित करून तीन-चार मोठ्या कंपन्या सुरू करण्यास राज्य सरकारने प्राधान्य द्यावे. सातारा शहर पुणे, मुंबई, बंगळुरू या शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे, तरीही साताऱ्यात एकही मोठा उद्योग वा कंपनी नसल्याची अनेक वर्षांची खंत सातारकरांना आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या औद्योगिक संधीचा फायदा सातारा शहर आणि एमआयडीसीलाही व्हावा. याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.