बॉलीवूडमध्ये ब्रेकअप, घटस्फोट हे प्रकार सर्रास घडतात. हॉलीवूडमध्ये तुलनेने अधिक प्रमाण आहे; परंतु त्याच वारं बॉलीवूडला देखील लागले आहे.
साधारणपणे एखाद्या व्यक्तीचा किंवा महिलेचा घटस्फोट झाल्यास संबंधित जोडप्यांचे मार्ग वेगळे होतात आणि ते कधीही समोरासमोर येत नाहीत. समोरच्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्याचे नुकसान झाले, अशी भावना मनात निर्माण झाले. परंतु बॉलीवूडमध्ये अशा भावनांना काहीच स्थान नाही. तेथे असा फारसा फरक पडत नाही की, आज एखाद्या कलाकाराबरोबर फिरणारी गर्लफ्रेंड ही उद्या अन्य कलाकाराबरोबर फिरेल किंवा एखाद्या नायिकेचा पती हा उद्या दुसऱ्या महिलेचा पती म्हणून समोर येतो आणि असे चित्र नेहमीच पाहावयास मिळते.
रणबीर-दीपिका : रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांच्या प्रेमाच्या सुरस कहाण्या आजही सांगितल्या जातात आणि आता दोघेही वेगळे होऊन आनंदी जीवन जगत आहेत. एकमेकावर जीवापाड प्रेम करणारे जोडपे म्हणून या दोघांची ओळख होती. त्यांची भट्टी काही जमली नाही आणि ब्रेकअप झाले. आज रणबीर कपूरने आलिया भट्टशी विवाह केला आणि दीपिका ही रणवीर सिंगची बायको आहे. या चौघांत थोडाही बेबनाव दिसत नाही. दीपिका आणि आलिया या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्याचबरोबर रणबीर आणि रणवीर हे देखील एकमेकांना उत्साहाने भेटतात. ते केवळ जवळेचच नाही तर एकमेकांना प्रोत्साहित देखील करत असतात. दोघेही टॉक शो “कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात पोहोचले असता त्यांचे प्रेम पाहून प्रेक्षकही गोंधळले. आलिया देखील आजही रणबीर कपूरच्या उपस्थितीत रणवीर सिंहच्या कानात काहीतरी सांगते आणि दोघेही खळखळून हसतात. एकमेकांना टाळी देखील देतात आणि समोरचा माणूस मात्र हे सर्व पाहून दंग राहतो. बॉलीवूडचा हा स्वभाव आजचाच नाही, तर त्याला अनेक दशकांपासूनची परंपरा आहे.
जॉन-बिपाशा बासू : अभिनेत्री बिपाशा बासू आणि हॅंडसम जॉन अब्राहम यांची प्रेमकहाणी विख्यात आहे. दोन शरीर आणि एक आत्मा असे त्यांचे प्रेम होते. दोघांनी बॉलीवूडला अनेक चित्रपट दिले आणि ते कधी बोहल्यावर चढतील याची प्रेक्षक वाट पाहात होते. परंतु तब्बल एक दशक सोबत राहिल्यानंतर पुढे त्यांचे प्रेम टिकले नाही. दोघेही एकमेकांपासून दूर गेले; परंतु ते शत्रू बनले नाहीत. आजही दोघे एकमेकांना हसून प्रतिसाद देतात. त्याचवेळी बिपाशाचा नवरा अभिनेता करण सिंह ग्रोव्हर हा जॉन अब्राहमकडून बॉडीसंदर्भात टिप्स घेत असतो.
शाहीद-करीना : शाहीद कपूर आणि करीना कपूर हे वेगळे होतील, असे कोणालाही वाटले नव्हते. “जब वुई मेट’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला आणि हा चित्रपट त्यांच्या प्रेमाचा कळसाध्याय होता; परंतु कालांतराने त्यांचा ब्रेकअप झाला. ते कधीही समोरासमोर येणार नाहीत आणि पडद्यावर देखील एकत्र चमकदार नाही, असे अनेकांना वाटू लागले. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अगदी सहजपणे उत्तर दिले की, एकत्रित चित्रपट करताना आपल्याला काहीही फरक पडणार नाही. वेगळे झाल्यानंतर दोघांनी काही चित्रपट देखील केले. केवळ करीना आणि शाहीदच नाही तर शाहीद आणि सैफ यांच्यातही कोणत्याही प्रकारचे वैर नाही. दोघांचे ट्यूनिंग चांगले आहे.
सलमान-ऐश्वर्या : सलमान खान आणि ऐश्वर्या यांची स्टोरी वेगळी नाही. बॉलीवूडमधील दोन शक्तिशाली कुटुंबातील हे दोघे आहे. ऐश्वर्या ही बच्चन घराण्याची सून आहे तर सलमान हा खान कुटुंबातील दिग्गज अभिनेता. ज्या रीतीने दोघांचे ब्रेकअप झाले, ते पाहता सलमान खानचे ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयासाठी नाते टिकणार नाही, असे वाटू लागले; परंतु सलमान खान हा दिलीपकुमार यांच्यानंतर अमिताभ बच्चन यांचा सर्वाधिक आदर करतो. अमिताभ बच्चनदेखील सलमानला आपल्या मुलाप्रमाणे वागवतात. याचाच अर्थ असा की या ब्रेकअपमुळे सलमान आणि बच्चन कुटुंबात कोणतीही कटुता आलेली नाही.
सुश्मिता सेन-रोहमन शॉल : अभिनेत्री सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल यांचा ब्रेकअप झाला तेव्हा चाहत्यांना धक्का बसला. कोणालाच या काडीमोडची कल्पना नव्हती. परंतु सुश्मिता सेनने इन्स्टाग्रामवर रोहमन आता माझ्यासोबत नाही, अशी पोस्ट केली. हे वाचताच चाहते नाराज झाले. परंतु सुश्मिताने रोहमन शॉलबरोबरचा एक फोटो शेअर केला. त्यात ती म्हणते, की मैत्रीने आमचे नाते सुरू झाले होते. मैत्री राहील, परंतु संबंध अगोदरच संपले. प्रेम मात्र कायम आहे.
संजीवकुमार-हेमामालिनी-जितेंद्र : एक काळ असा होता की हेमामालिनीशी संजीवकुमार आणि जितेंद्र हे दोघेही विवाह करू इच्छित होते. कोणत्याही स्थितीत ते लग्नाला तयार होते. परंतु धर्मेंद्र यांनी या दोघांदेखत हेमामालिनीला आपलेसे केले. या त्रिकोणी प्रेमाचा सिलसिला तेथेच थांबला. धर्मेंद्र आणि हेमामालिनीचे लग्न होताच हेमामालिनीच्या विवाहसंबंधीच्या वावड्या थांबल्या. या दोघांनीही ब्रेकअप पचविले.
अशी उदाहरणे पाहिल्यास बॉलीवूडमध्ये ब्रेकअपचे फारसे मनावर घेतले जात नाही, हे आपल्या लक्षात येईल. दिलीपकुमार-मधुबाला, अमिताभ बच्चन-रेखा, अक्षयकुमार-रवीना टंडन या कलाकारांचे ब्रेकअप गाजले. परंतु त्यांनी या ब्रेकअपचा आपल्या करियरवर परिणाम होऊ दिला नाही. या ब्रेकअपच्या बातम्यांचाही ते आनंद घेताना दिसतात.