पुणे – राज्यातील शाळाबाह्य, स्थलांतरिक व अनियमित उपस्थित असणाऱ्या मुलांचा शोध घेण्यासाठी “बालरक्षक ऍप’चा वापर करण्याचा पायलट प्रोजेक्ट लांबणीवर पडला आहे.
राज्यात दरवर्षी शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण मोहीम घेण्यात येते. काही वर्षांपूर्वी राज्यात 35 हजार शाळाबाह्य मुले आढळून आली होती. मागील वर्षापासून करोनामुळे यात वाढ झाली आहे. मात्र मार्चमध्ये झालेल्या सर्वेक्षणात 25 हजार 204 मुलेच शाळाबाह्य आढळून आली. दरम्यान, या सर्वेक्षणात काही तरी घोळ असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर, काही जिल्ह्यांत सर्वेक्षणच झाले नव्हते.
शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन संबंधितांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी 2 हजार 870 शिक्षकांच्या बालरक्षकपदी नियुक्त्या केल्या होत्या. “एक गाव एक बालरक्षक’ अशी मोहीम गेल्या वर्षापासून राबविण्यात आली. तसेच, “बालरक्षक ऍप’चीही निर्मिती केली होती. प्रायोगित तत्वावर पाच तालुक्यांत या ऍपचा वापर करण्याचेही निश्चित झाले होते. अहमदनगर (राहता), नंदूरबार (धडगाव), चंद्रपूर (भ्रदावती), कोल्हापूर (कागल), बीड (शिरुर कासार) यांचा समावेश होता. 1 ते 20 ऑक्टोबरदरम्यान बालरक्षक ऍपचा वापर करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
“करोनामुळे सर्वच जिल्ह्यांतील शहरी, ग्रामीण भागातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. शाळाच सुरू नसल्याने शाळाबाह्य बालकांचा शोध घ्यायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे बालरक्षक ऍपचा वापर करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. शाळा सुरू झाल्यानंतरच त्याचा वापर करून अहवाल तयार होतील.” – दिनकर टेमकर, संचालक, प्राथमिक शिक्षण