नवी दिल्ली – कोविडच्या ओमायक्रॉन या विषाणुच्या प्रादुर्भावामुळे देशात पुन्हा एक वेगळे आव्हान निर्माण झाले आहे या आव्हानाला तोंड देण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली आहे, असा सवाल करीत लोकसभेत आज विविध पक्षाच्या सदस्यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.
कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधिररंजन चौधरी यांनी शुन्य प्रहरात हा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की देशात आत्ताच ओमायक्रॉनचे 41 रूग्ण आढळून आले आहेत. या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने आता जय्यत तयारी सुरू केली पाहिजे.
युरोपियन देशांनी या पार्श्वभूमीवर मुलांचे लसीकरण सुरू केले आहे तशी उपाययोजना आपण कधी करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की देशातील अनेक राज्यांमध्ये हा विषाणू पसरत असून सरकारने दक्ष राहिले पाहिजे असे ते म्हणाले. तृणमुल कॉंग्रेसचे सौगत रॉय यांनी सरकारने आता देशात बुस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे अशी सूचना केली.
सरकारला सल्ला देणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीत यावरून मतभेद झाल्याने देशात बुस्टर डोस दिले जात नाहीत असा दावा त्यांनी केला. ब्रिटनने ओमायक्रॉनच्या संबंधात आणीबाणी जाहीर केली आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. आपण गाफिल राहिलो तर देशात कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. ब्रिटनमध्ये ओमक्रॉनचा पहिला बळी नोंदवला गेला आहे.
आता भारत सरकारने त्यावर काय दक्षता घेतली आहे याची देशवासियांना माहिती मिळाली पाहिजे अशी सूचना तृणमुल कॉंग्रेसचेच सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी केली.