नवी दिल्ली – राजस्तानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी मोदी हेच पंतप्रधानपदी पुन्हा निवडून यावेत असे विधान केले होते. त्याविषयी आयोगाकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची शहानिशा केली. त्यात राज्यपालांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला आहे. कल्याणसिंह हे घटनात्मक पदावर कार्यरत आहेत त्यांनी अशा प्रकारचे राजकीय विधान करणे योग्य नव्हते असे नमूद करीत त्यांच्या विरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
राज्यपाल पद हे बिगर राजकीय स्वरूपाचे पद आहे त्यांना एरवीही अशी राजकीय स्वरूपाची विधाने करण्यास मज्जाव आहे. आपल्या अलिगड येथील निवासस्थानी 23 मार्च रोजी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यांनी त्यात मोदींनाच निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला होता. सन 1990 मध्ये हिमाचल प्रदेशचे राज्यपाल गुलशेर अहमद यांनी आपल्या मुलाचा प्रचार केल्याने त्यांच्या या कृतीच्या विरोधात निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता निवडणूक आयोगाने राज्यपाल कल्याणसिंह यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा स्पष्ट निष्कर्ष काढल्यानंतर त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जाऊ शकते.