मुंबई : शिक्षणाला कोणत्याही भौगोलिक सीमा नसतात. शिक्षण हे जीवननिर्मित, मानवनिर्मित आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व निर्माण करणारे असावे. ऋग्वेदामध्ये सामूहिक मंथन आणि चिंतनाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये उच्च शैक्षणिक सहकार्याच्या दृष्टीने सातत्याने विचार मंथन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठे व अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने राज्यपालांच्या पुढाकाराने आयोजित उच्च शिक्षण परिषदेचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे संपन्न झाले.
या परिषदेला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माइक हँकी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, अमेरिकेच्या विविध विद्यापीठांचे प्रमुख तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरु व कुलसचिव उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याला अधिक महत्त्व आहे. या परिषदेमुळे अमेरिका आणि भारत यांच्यात अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया, विद्यार्थी आणि शिक्षक आदानप्रदान, विविध अभ्यासक्रम आखणी आदी विषयांवर सविस्तर चर्चा होईल.
ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व – चंद्रकांत पाटील
भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. ही अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आमचे ध्येय असून आजच्या जगात ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व आहे. माहिती तंत्रज्ञान हे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेचे प्रमुख उदाहरण आहे. भारताने अमेरिकेप्रमाणेच ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेत लक्षणीय प्रगती केली आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक बाबींमध्ये साम्य आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
या परिषदेत द्विपदवी अध्ययन व अध्यापन प्रक्रिया, संशोधन, विविध अभ्यासक्रम, भाषांतर, चर्चासत्र, शैक्षणिक परिषदा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.