“वृंदा, अगं उशीर होतोय. लांबचा प्रवास आहे.’ “आले माई.’ थोड्यावेळाने वृंदा खाली आली, “माई, मी डब्यात तिळाचे लाडू करून ठेवलेत. रोज सकाळी खायचे.’ तेवढ्यात आप्पा झोपाळ्यावरून उठले आणि बॅगा गाडीकडे ओढत नेऊ लागले. “आप्पा, बॅग जड आहेत. राहू द्या बरं तुम्ही.’ वृंदाने आप्पांच्या हाताला धरून बाजूला केलं आणि स्वतः बॅगा गाडीत नेऊन ठेवल्या. “आप्पा, मी कालच तुमच्या गोळ्या आणून ठेवल्यात. “म्हणजे माझ्यासाठी फक्त औषधंच? आणि हिच्यासाठी मात्र लाडू! या घरात हिचेच लाड जास्त करतेस तू.’ तेवढ्यात पाठीमागून सावीचा आवाज आला.”आजोबा, मी आहे ना तुमचे लाड करायला.’ आप्पांनी सावीला जवळ घेतलं. माई आणि वृंदा दोघी एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. “आप्पा, मी ना तुम्हाला गावाकडून येताना बोरं आणते खायला.’ “थोडी करवंद पण आण. करवंद चालतात डायबेटिसच्या पेशंटला.’ वृंदा हसून, “बरं, आणते. माई आप्पांनी कितीही केविलवाणा चेहरा केला तरी त्यांना लाडू खायला द्यायचा नाही. नाहीतर जाल लगेच पाघळून!’ “सावी, पाया पड आजी-आजोबांच्या.’ दोघी मायलेकी आप्पा-माईचा आशीर्वाद घेऊन निघाल्या. “वृंदा जपून जा आणि पोहोचली की फोन कर.’ “हो माई.’ माई वृंदाच्या गालावरून हात फिरवत बोलू लागल्या. “पोरी, वाड्याकडं जाऊन ये. तुझ्या आईवडिलांची शेवटची आठवण ती तेवढीच उरलीय.’ नकळत वृंदाचे डोळे पाणावले. “बरं माई. येऊ का मी आता?’ गाडी नजरेआड होईपर्यंत माई आणि आप्पा तिथंच उभे होते.
काहीवेळाने दोघे आत आले. आता आठवडाभर घर कसं खायला उठेल. गुडघ्यावर हात टेकवत माई खाली बसल्या. आप्पा भिंतीवर अडकवलेल्या आपल्या मुलाच्या फोटोसमोर शांत उभे होते. “तुला तो दिवस आठवतोय, जेव्हा आकाश पहिल्यांदा वृंदाला आपल्या घरी घेऊन आला होता?’ माई हसून, “हो. काष्ट्याची साडी घालून आली होती. नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर. तिचं ते लडिवाळपणे बोलणं; पहिल्याच भेटीत माई-माई करणं; जणू आधीच परमेश्वराने तिच्याशी आपल्या सगळ्यांच्या गाठी बांधल्या होत्या.’ आप्पांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि झोपाळ्यावर येऊन बसले. “आपल्या झोळीत पोरीचं सुख टाकलं; पण तिचं सौभाग्याचं लेणं पुसून घेताना त्याला काय मिळालं कुणास ठाऊक? नशिबापुढं कुणाला जाता आलंय का? आपल्या आकाशचं आयुष्यच तेवढं होतं म्हणायचं. आज दहा वर्षे झाली त्याला जाऊन. सावीसाठी कधी तिचा बाप होऊन जगत असते; तर आपल्यासाठी कधी आपलं पोरगं होऊन झिजत राहते. आकाशच्या आठवणीत डोळ्यात पाणी आलं की; पटकन डोळे पुसायला धावून येते आणि स्वतः मात्र एकटीच आतल्या आत दुःख गिळत बसते. स्वतःचं जगणं पार विसरून गेलीय.’ बोलता बोलता माई शांत झाल्या. डोळे मिटून घेतले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
गाव जसजसं जवळ येत होतं; पुसट झालेल्या आठवणींच्या पाऊलखुणा पुन्हा वृंदाच्या मनाचा ठाव घेत होत्या. आजही नदी तहानलेलीच का? आणि रुक्ष वाटणारी ती बाभळ आजही तशीच दिसते. नाहीतरी तिच्या बहरण्यात काट्यांचच कोंदण असणार म्हणा! तिला कितीही वाटलं आपल्या छायेत यावं कुणीतरी; पण… आणि आजही मुंजोबा त्याच पिंपळाखाली ध्यानस्थ बसलेला दिसतोय. “सावी, शाळेतून घरी जाताना रोज आम्ही दोघी या मुंजोबाच्या पुढचा प्रसाद खायचो. शाकू म्हणायची; उलीसाच घे नाहीतर तो आपल्याला शिक्षा करेल.’ मध्येच आपली आई काय सांगते हे सावीला कळत नव्हतं. “ममा, कोण शाकू?’ अधूनमधून सळसळणाऱ्या पानांनी त्या मुंजोबाची शांती भंग व्हावी तशी आठवणीत तल्लीन होऊन बडबडणाऱ्या वृंदाची तंद्री सावीच्या प्रश्नाने भंग झाली. वृंदा भानावर येत, “शकुंतला, माझी बालमैत्रीण. मी तिला शाकू म्हणायचे. खूप घट्ट मैत्री होती आमची.’ “ओके. कुठे आहे तुझी फ्रेंड आता?’ “माहीत नाही.’ असे म्हणत वृंदाने फोन हातात घेतला. “माई, पोचलो बघ आम्ही.’ “तुझ्याच फोनची वाट पाहात होतो आम्ही. काळजी घे.’ “बरं माई. ठेवते.’
वृंदा एक डॉक्टर होती. दर दोन-चार महिन्यांत एखाद्या खेडोपाडी ती आपल्या सहकाऱ्यांबरोबर कॅम्प भरवायची. निःस्वार्थ भावाने रुग्णांची सेवा करताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असायचं. वृंदाने गाडी सरकारी विश्रामगृहाजवळ थांबवली. “गुड इव्हनिंग मॅडम.’ “डॉ. पाठक, तुम्ही कधी आलात?’ “तासाभरापूर्वीच आले. डॉ. कावेरी देखील आल्यात काहीवेळापूर्वी.’ “हो का. चला म्हणजे आज रात्री त्यांच्या कवितांचा एक डोस घेतल्याशिवाय त्या काही आपल्याला निवांत झोपू देणार नाहीत!’ दोघी एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. दुसऱ्या दिवशी, “डॉ. पाठक, तुम्ही या दिशेने जा आणि मी या दिशेने जाते. डॉ. कावेरी, तुम्ही तोपर्यंत सर्व टॅब्लेट्स, सीरप सॉर्ट आऊट करून ठेवा.’
“ममा, मी पण येते सोबत.’ “बाळा, दमशील तू. चालत जायचंय.’ “नाही दमणार.’ “बरं चल.’ वृंदा प्रत्येक घरी जात होती. घरात कोणी आजारी असल्यास तपासणी करून गोळ्या औषधं देत होती. दुपार होत आली होती. चालता चालता वाटेत वाडा लागला. जाळ्या जळमटांनी वाड्याचं दार झाकून गेलं होतं. वृंदा क्षणभर वाड्याला न्याहाळत थांबली. “ममा, मला तहान लागलीय.’ वृंदा तिच्याच विचारात चालू लागली. हा जिजीचा वाडा वाटतोय. दार तर उघडच दिसतंय, म्हणून वृंदाने कडी वाजवली. “कोणी आहे का घरात?’ आडात टाकलेल्या पोहऱ्याच्या धप्प आवाजाने कुणीतरी असल्याची खात्री झाली आणि ती आत गेली. पाणी शेंदणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहून वृंदाने विचारलं, “कोण आहे? थोडं पाणी मिळेल का प्यायला?’ वृंदाचा आवाज ऐकून तिने मागे वळून पाहिलं आणि हाताशी घट्ट धरून ठेवलेला पोहऱ्याचा दोर
सर्रऽऽर्रर्रर्र करत निसटू लागला. “शाकू तू!’ म्हणत वृंदा धावतच तिच्याजवळ गेली आणि निसटलेल्या पोहऱ्याला पुन्हा वर खेचू लागली. वृंदाने शाकूला घट्ट मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. दोघींच्या तोंडून एक शब्द फुटत नव्हता. दोघी फक्त एकमेकींकडं पाहात होत्या. “वृंदा, मी स्वप्नात तर नाही ना?’ वृंदाने तिचे डोळे पुसले. “तू आधी सावलीला बस बरं. अवघडलेलं शरीर घेऊन अशी जड कामं करतात का?’ “मुलगी तुझी?’ “हो. सावी, तुला मघाशी सांगितलं ना माझी बालमैत्रीण ती हीच. शाकू.’ शाकूने सावीला जवळ घेतलं. “मला तहान लागलीय.’ “मी पण वेड्यासारखी दारातच बोलत बसलीय. चला या आत.’ शाकूने दोघींना प्यायला पाणी दिलं.
“काय करू तुला खायला?’ “काही नको. तुला भेटून पोट भरलं.’ “अगं असं कसं? उलीसा चहा तरी?’ “बरं बाई कर. तुझ्या डिक्शनरीतल्या उलीसाला अजून पर्यायी शब्द भेटला नाही वाटतं!’ दोघी एकमेकींकडं पाहून हसू लागल्या. “जिजी कुठे?’ “चार वर्षे झाली तिला जाऊन.’ वृंदा शाकूजवळ येऊन बसली. “आई-बाबा गेल्यानंतर दहा वर्षांनी इकडे आलीय.’ माहीत नव्हतं गं मला. पण मग तू इकडे कशी?” “चहा घे. सगळं आजच बोलणार का? उद्यासाठी ठेव की काही.’ “चांगली आठ दिवस आहे मी इथं.’ “काय सांगतेस?’ “हो. आमचा हेल्थ कॅम्प आहे आठवडाभर. तुला पण मी काही व्हिटॅमिनच्या गोळ्या देते. तुझ्या आणि होणाऱ्या तुझ्या बाळासाठी.’ काहीवेळाने वृंदा जायला निघाली. “उद्या ओढ्याजवळ भेटायचं?’ “हो. भेटू.’ “काळजी घे.’
दुसऱ्या दिवशी दोघी ठरलेल्या ठिकाणी एकत्र आल्या. “शाकू, मोरपीस होऊन तरंगल्यासारखं वाटतंय गं.’ ओढ्याच्या आत पाय ठेवताच क्षणभर तोसुद्धा थांबल्यासारखा वाटला. आजही तो आपला स्पर्श विसरला नाही. पायाला गुदगुल्या करून खोडी काढायची त्याची सवय गेली नाही अजून. शाकूने वृंदाच्या हातावर आपला हात टेकवला. त्याला त्याच्या नदीला भेटायची ओढ आहे. काहीवेळाने तो आपल्या पायाला विळखा घालून निघून जाईल. आणि का नको जावं त्याने? आपण नाही का त्याला एकट्याला सोडून निघून गेलो होतो. वृंदा शाकूच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. “शाकू, आजही कपाळावर कुंकू लावायला विसरलीस?’ शाकू एकटक त्या प्रवाहाकडं पाहात होती. “शाकू, काय विचारतेय मी?’ शाकू थरथरत्या आवाजात बोलू लागली.
“सहा महिन्यांपूर्वी एका अपघातात…’ वृंदाने शाकूचा हात घट्ट धरला. काहीवेळ दोघी निःशब्द होत्या. “सासरचे तुला नीट तर बघतात ना?’ “मला आणि माझ्या होणाऱ्या बाळाला सांभाळू शकत नाही म्हणून महिनाभरातच घराबाहेर काढलं.’ ती आपलं सगळं दुःख वृंदासमोर व्यक्त करत होती. “कुणीतरी आपल्या आत खोल शिरावं; आहे नाही तेवढं आत साचलेलं काढून घ्यावं असं खूप वाटायचं. आज हलकं वाटतंय तुझ्याशी बोलून.’ “ठेव हा विषय बाजूला.’ “तुझा संसार कसा चाललाय?’ “क्लिनिक; घरी आलं की सावीचा अभ्यास; रविवारी तिचा कथ्थकचा क्लास; आप्पा आणि माईंची काळजी घेण्यात दिवस कसा निघून जातो कळतच नाही.’ “सावीचे बाबा काय करतात?’ “दहा वर्षे झाली आकाशला जाऊन.’ हे ऐकून शाकूला धक्काच बसला.
एवढा वेळ आपण जिच्या खांद्यावर डोकं ठेवून मनावरचं ओझं हलकं करत होतो; तीच आतून तुटली आहे हे कळताच शाकूच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. “मला माहितेय तुला प्रश्न पडला असेल; की माझ्या भाळी हे कुंकू कसं? आप्पा आणि माई पोटच्या पोरीसारखा जीव लावतात. माझं भरलं कपाळ पाहून आकाश आमच्यातच आहे हा एक विचारसुद्धा त्यांना निस्सीम सुख देऊन जातो. आणि त्यांच्या सुखातच आता माझं सुख आहे.’ शाकू भरल्या डोळ्यांनी वृंदाकडं पाहात होती. आज तिला तिच्या कपाळावर नसलेल्या कुंकवापेक्षा; वृंदाच्या कपाळावरचं कुंकू पाहून डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना रोखता येत नव्हतं… शेवटी प्रारब्ध!
अमोल भालेराव