“मध्ययुगीन परंपरेतील संत-सत्पुरुष आणि बुद्ध, महावीर,येशू,महात्मा गांधी,विनोबा यांच्यासारख्या महामानवांनी मानवी कल्याणाचा सदैव ध्यास घेतला होता.त्यांच्या वाङ्मय संचितात माणुसकी, प्रेम,भूतदया,अहिंसा अशा स्थायी मूल्यांचा उद्घोष आहे.काळ कितीही बदलला तरी वाङ्मयमूल्यांचे महत्त्व कमी होणारे नाही.
त्यामुळे आज जागतिकीकरणाने व बाजारु व्यवस्थेने निर्माण केलेल्या समस्यांची उकलही या वाङ्मयसंचिताच्या आधारे करता येऊ शकते.पण त्यासाठी या वाङ्मयाकडे पाहण्याची निर्मळ दृष्टी हवी.’दिंडी’ मधील प्रा.विश्वाधार देशमुख यांच्या लेखनात ही निर्मळ दृष्टी ठळकपणे जाणवते.
संत वाङ्मयाचा दांडगा व्यासंग,समर्पक अवतरणे, शब्दप्रभुत्व आणि रोचक उदाहरणे यांमुळे हे लेखन तजेलदार आणि ललितरम्य झाले आहे.संत वाङ्मयाबद्दल लिहिताना अनेक लेखक टीका करतात किंवा भाबडी गौरवाची भूमिका तरी घेतात.या दोन्ही टोकाच्या बाजू सोडून समतोल वृत्तीने आजच्या काळाच्या संदर्भात या वाङ्मयाचे मोल विशद करणारे हे लेखन आहे!
‘जगत माहिं संत परम हितकारी’ असे ब्रह्मानंदांचे एक प्रसिद्ध पद आहे.संत वाङ्मयाबद्दचे हे लेखनही असेच ‘परम हितकारी’ आहे असे वाटते!”
– डॉ.श्रीनिवास पांडे
(संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक)