हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि गुणी कलाकार सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यानिमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवर बोट ठेवण्यात येत आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया देताना या विषयाला तोंड फोडले.
काही जणांनी करण जोहर, सलमान खान, आलिया भट यासारख्या कलाकारांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
यातच आता अभिनेता गोविंदा हादेखील घराणेशाहीवर व्यक्त झाला असून कलाविश्वातील ४-५ जण सारा कारभार पाहत असल्याचं त्याने वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की,’पूर्वी ज्याकडे टॅलेंट होतं त्याला काम मिळत होतं. सगळ्या चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत होती. परंतु, आता चार-पाच लोकांनी संपूर्ण कारभार हातात घेतला आहे. त्यामुळे जे लोक यांच्या जवळचे नाहीत त्यांच्या चित्रपटाचं नशीब हेच लोक ठरवतात. माझ्या काही चांगल्या चित्रपटांना प्रदर्शितच करता आलं नाही. पण आता परिस्थिती बदलताना दिसते’