नवी दिल्ली – रिटेल उद्योगासमोर या शतकातील सर्वात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. 100 दिवसांत व्यापाऱ्यांचे 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा व्यापाऱ्यांच्या संघटनेने केला आहे.
100 दिवसांपासून अनेक दुकाने पूर्णतः किंवा अंशतः बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या उपजीविकेच्या साधनांवर परिणाम झाला आहे. मात्र, केंद्र किंवा राज्य सरकारकडून त्यांना थेट मदत होईल अशी कुठलीही उपाययोजना जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे नजिकच्या काळामध्ये 20 टक्के व्यापारी आपले दुकाने बंद करून उपजीविकेसाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब करतील, असे कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेने म्हटले आहे.
या संघटनेने सांगितले की, ग्राहक कमी झाले आहेत. आलेले ग्राहक कमी खरेदी करीत आहेत. पुरेसे कामगार नाहीत. भांडवलाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, याच काळात त्यांना कर्जावरील हप्ते, कर इत्यादी नियमाप्रमाणे भरावे लागत आहेत.
पॅकेजमध्ये व्यापारी तरतूद करण्यात आली नाही. याबद्दल या संघटनेने खेद व्यक्त केला आहे. लॉकडाऊनमध्ये व्यापारी वर्गाने जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासू दिलेली नाही. या वर्गाची कार्यक्षमता आणि भांडवलक्षमता संपुष्टात येत आहे. त्यासाठी या वर्गाला सरकारने मदत करण्याची गरज आहे.