प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 19 – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळ्यातील एक हजारांपेक्षा अधिक शिक्षक, कर्मचाऱ्यांची शालार्थ सेवा गोठवून त्यांचे वेतन तातडीने थांबविण्यात येणार आहे.
19 जानेवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या “टीईटी” परीक्षेत 16 हजार 705 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. या परीक्षेच्या निकालात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याने घोटाळा झाल्याची बाब पुणे पोलिसांनी उघडकीस आणली. 7 हजार 874 उमेदवार अपात्र असतानाही निकालात गडबड करून त्यांना पात्र करण्यात आले. शासनाने याबाबत कारवाई करण्याचे आदेशही जारी केले होते. संबंधित उमेदवारांचे “टीईटी’चे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असून त्यांना आगामी कालावधीत “टीईटी’ परीक्षेला बसण्यास कायमस्वरुपी प्रतिबंध घालण्यात आला आहे. शाळांमध्ये नोकरीला असलेल्यांच्या सेवा समाप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित शिक्षकांचा तपास सुरू सदर कारवाई तातडीने करण्यात येणार आहे.
बोगस उमेदवारांची यादी संकेतस्थळावर…
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घोटाळेबाज, बोगस उमेदवारांची यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. पुढील कारवाईसाठी प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण संचालकांना आदेशही दिले आहेत. यानुसार संचालकांनी ऑनलाइन यंत्रणेद्वारे शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांचा आधारकार्ड, शालार्थ आयडीमार्फत शोध घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 1 हजार 32 जणांचा शोध लागला आहे. यात प्राथमिकच्या 576 तर माध्यमिकच्या 456 जणांचा समावेश आहे. या सर्वांचे शालार्थ आयडी गोठवून वेतन रोखण्यात येणार आहे. घोटाळ्याद्वारे प्रमाणपत्र मिळवून कोण कोण कार्यरत आहेत, याची पडताळणीही संचालक कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरुन पुढील कार्यवाही होणार आहे. याबाबतचे आदेश जारी झाल्याने संबंधीत शिक्षक अडचणीत येणार आहेत.