प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 19 – खडकवासला धरणसाखळीतील टेमघर धरण यंदा पहिल्यांदाच 100 टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून शुक्रवारी वाहने सुरू झाले. या धरणात 3.71 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. दरम्यान, आता खडकवासला, पानशेत, वरसगाव पाठोपाठ टेमघर या चारही धरणात मिळून 100 टक्के म्हणजे 29.15 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. यावर्षी टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि. 1 जून 2022 ते दि.19 ऑगस्ट 2022 पर्यंत एकूण 2864 मिलीमीटर पाऊस पडला असून मागच्या वर्षी याच दिवसापर्यंत 2,432 मिलीमीटर पाऊस पडला होता. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणातील पाणीसाठा 88 टक्के होता.
खडकवासला धरणातून विसर्ग वाढला
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पानशेत व वरसगाव धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. या दोन्ही धरणांतून सोडण्यात येणारे पाणी खडकवासला धरणात जमा होते. त्यामुळे खडकवासला धरणातून शुक्रवारी रात्री 8 वाजता सुमारे 11 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात सुरुवात झाली. धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने नदीपात्रालगत उभी असलेली वाहने पाण्यात वाहून जाण्याची शक्यता असल्याने जलसंपदा विभाग व पालिकेने वाहने काढून घेण्याचे आवाहन केले. तसेच मंडळांनीही लाऊडस्पीकरवरून आवाहन केले. त्यामुळे काही नागरिकांनी आपली वाहने नदीपात्रातून बाहेर काढली.
धरण- पाणीसाठा (टीएमसी)- टक्के
खडकवासला – 1.97 – 100
पानशेत -10.65 -100
वरसगाव -12.82 -100
टेमघर- 3.71 -100