सातारा – करोनामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या सात-आठ महिन्यांपासून बंद असलेले बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि अतिशय दुर्गम अशा वासोटा किल्ल्यावरील पर्यटन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे गुरुवारपासून पुन्हा सुरू झाले आहे. याबाबतचा निर्णय जिल्हा प्रशासनाने नुकताच घेतला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या भागातील बोटिंग, हॉटेल व्यवसाय व पर्यटन बंद असल्याने या भागातील दोन-अडीच हजार व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांची उपासमार होत होती. “अनलॉक’मध्ये सर्वत्र सर्व व्यवसाय सुरू झाल्याने बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा पर्यटन पुन्हा सुरू व्हावे, अशी मागणी तेथील व्यावसायिक व ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली होती. त्यांनीही या प्रश्नावर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची सोमवारी (दि. 2) भेट घेऊन याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देण्याची मागणी केली होती.
आ. शिवेंद्रराजेंची मागणी मान्य करत ना. देसाई यांनी प्रशासनाला तात्काळ सूचना दिल्या. त्यानंतर दोन- तीन दिवसांत याबाबतचा निर्णय झाला. आ. शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्यामुळे बोटिंग व पर्यटन सुरू झाल्याने स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. आज सकाळपासूनच पर्यटक बोटीतून किल्ले वासोटा दर्शनाला जाण्यास सुरुवात झाली आहे. उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेले बोटिंग व पर्यटन सुरू झाल्याने या भागातील विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसणार आहे.