अंजली खमितकर
पुणे : करोना प्रतिबंधक लसीकरणानंतर 15 दिवसांनी रक्तदान करता येते, याविषयीची जागरुकता वाढणे आवश्यक असून, रक्तातून संसर्गित होणाऱ्या रोगांची “मायक्रोलेव्हल’ तपासणी व्हावी, यासाठी “रक्तपेढ्यांनी’ही आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. 14 जून या “जागतिक रक्तदाता दिना’निमित्त हा संकल्प प्रत्येक व्यक्तीने आणि रक्तपेढ्यांनी करणे आवश्यक आहे. यावर्षी “रक्तदान हे ऐक्याचे कार्य : सहभागी व्हा आणि जीव वाचवा’ ही संकल्पना घेऊन जागतिक पातळीवर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
ऐच्छिक रक्तदान चळवळीला गती मिळावी
रक्तसंक्रमणासाठी सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनाच्या गरजेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेत ऐच्छिक आणि कोणताही मोबदला न घेता रक्तदान करणाऱ्यांचे महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित करण्यात येते. राष्ट्रीय रक्तसंक्रमण सेवा, रक्तदानाच्या क्षेत्रात कार्यरत संस्था आणि स्थानिक उपक्रमांना प्रोत्साहित करताना ऐच्छिक रक्तदानाच्या चळवळीला गती देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येतो.
चाचण्या करणे आवश्यक
रक्त संकलित केल्यानंतर रुग्णाला देण्याआधी त्या रक्ताची सुरक्षितता अधिक तंतोतंत असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी “एलायझा’ हे तंत्रज्ञान वापरले जाते. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एचआयव्ही संक्रमित किंवा हिपेटायटिसचे विषाणू असलेले रक्त लगेचच समजते. मात्र,यात अधिक अचूकता येण्यासाठी तसेच करोना सारख्या विषाणूंचाही प्रादुर्भाव रोखण्यासाठी रक्ताचीही “न्युक्लिअर ऍसिड टेस्टिंग'(“नॅट’) प्रणाली जिला रक्ताची “आरटी-पीसीआर’ टेस्ट म्हणता येईल ती तपासणी प्रत्येक रक्तपेढ्यांनी करणे आवश्यक आहे.
…तर रोगांचा प्रसार थांबणे शक्य
अशी टेस्ट करणारे संपूर्ण भारतात सध्या दोन टक्केच रक्तपेढ्या आहेत. त्या शंभर टक्के होणे अत्यंत आवश्यक आहेत. या दोन टक्क्यांकडून एकूण रक्तसंकलनाच्या केवळ 10-15 टक्केच रक्ताची अगदी “मायक्रोलेव्हल’ म्हणजे “नॅट’ तपासणी होते. ओरिसा सरकारने स्वत: या प्रणालीचा सरकारी पातळीवर अंगीकार केला आहे. सर्वच राज्यांनी यामध्ये पुढाकार घेतला तर रक्तपेढ्यांच्या माध्यमातून, चांगल्या कामातून अनाहूतपणे होणारा हा रोगाचा प्रसार थांबवता येईल.
33 टक्के महिला रक्तदात्या जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगातील 79 देशांतील रक्तपुरवठ्यापैकी 90 टक्के ऐच्छिक रक्तदात्यांकडून होतो. तर 54 देशांत हे प्रमाण 50 टक्के आहे. इतर रक्तपुरवठा हा कुटुंबातील व्यक्ती किंवा पैसे मोजून इतर व्यक्तींकडून रक्ताची गरज भागवली जाते. जगातील एकूण रक्तदात्यांपैकी 33 टक्के महिला आहेत. एकूण रक्त संकलनापैकी 40 टक्के श्रीमंत राष्ट्रात संकलित केले जाते.
रक्तसंकलन केल्यानंतर त्याला पुढेही अनेक चाचण्या कराव्या लागतात. त्या चाचण्यांमधून तावून सुलाखून आल्यानंतरच हे रक्त रुग्णाला दिले जाते. मध्यंतरी “एलायझा’ तंत्रज्ञानातूनही निसटलेल्या 66 रक्तपिशव्या विषाणू संक्रमित होत्या, ज्या “नॅट’ च्या “आरटी-पीसीआर’ टेस्टमध्ये सापडल्या गेल्या. त्यातून किमान 200 जणांना हे रक्त दिले गेले असते. वास्तविक “एलायझा’ तंत्रज्ञान चुकीचे नाही, परंतु त्यालाही मर्यादा आहेत. तंत्रज्ञानातील ही मर्यादा “नॅट’ तंत्रज्ञानात बऱ्याच प्रमाणात सुधारित झाली आहे. रक्त सुरक्षितता वाढवणे अत्यंत आवश्यक असल्याने या आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार देशातील प्रत्येक रक्तपेढीने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
– डॉ. अतुल कुलकर्णी, जनकल्याण रक्तपेढी, पुणे