नगर – लोकसभा आणि आता विधानसभेची निवडणूक संपत नाही तोच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)ना आता दुबार,बोगस,मयत मतदार शोधून त्या याद्या अद्यावत करण्याचे काम करावे लागणार आहे. नवीन मतदार शोधून त्यांची नोंदवून मतदारयाद्या अद्यावत करण्याचे काम बाराही महिने करावे लागते.त्यात या कामाचे मानधनही वेळेत मिळत नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या कामांचे मानधन अजूनही मिळालेले नाही.
बीएलओ म्हणून ज्यांना नेमणुका दिल्या जातात त्यात 90 टक्के प्राथमिक शिक्षक असतात.केवळ 10 ते 5 टक्के तलाठी व ग्र्रामसेवकांना ही कामे दिली जातात. प्राथमिक शिक्षकांना शिकवण्याबरोबरच इतर अशैक्षणिक अनेक कामांचा बोजा शासन लादत असतानाच हा निवडणुकींच्या कामांचा भारही त्यांच्यावरच टाकला जातो.शासन एकीकडे सरकारी शाळातून गुणवत्तेची अपेक्षा करत आहे अन दुसरीकडे या शाळांतील शिक्षकांवर रोज नवा भार टाकत आहे.
आम्हाला केवळ शिकवण्याचे काम द्या.त्यानंतर गुणवत्तेत कुठे कमी पडलो तरी नियमानुसार हवी ती कारवाई करा अशी भूमिका सदर जबाबदारी असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी मांडली आहे. बाराही महिने निवडणुकीसह अशैक्षणिक कामांचा सतत बोजा लादला जातो.या कामांसाठी मिळणारे तुटपुंजे मानधनही वेळेवर मिळत नाही.लोकसभा निवडणुका होवून सहा-सात महिने झालेत अजूनही त्या कामांचे मानधन मिळालेले नाही.