मुंबई – बेळगाव व कर्नाटकच्या सीमा भागातील मराठी बांधवांच्या लढ्याला सहानुभुती दर्शवण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी आज काळ्या फिती लाऊन काम केले. सर्वच मंत्र्यांनी असा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलस्त्रोत मंत्री जयंत पाटील यांनीही आज काळी फित लाऊन काम केले.
या संबंधात बोलताना जयंत पाटील म्हणाले की हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत आहे तरीही कर्नाटकातील सीमा भागातील बांधवांवर होणारा अन्याय अजून थांबलेला नाही. हा मराठी भाषिक सीमा भाग लवकरच महाराष्ट्रात सामिल होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे नेते व नागरी विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी ठाणे येथे काळे फुगे हवेत सोडून आपल्या भावना व्यक्त केल्या. एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी सीमा भागातील मराठी बांधवांना उद्देशून एक पत्र लिहीले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, सीमा भागातील मराठी बांधवांच्या शिक्षण, सामाजिक न्याय, मराठी भाषेचे संरक्षण, अन्य विषयांच्या संबंधात आम्ही बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर आणि अन्य मराठी भाषिक प्रदेशातील नागरीकांशी वचनबद्ध आहोत.
मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीशी या भागातील जनतेने आपले प्रेम अभेद्य ठेवले आहे, ते अन्य मराठी भाषिकांसाठी प्रेरणादायी आहे असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
सीमा भाग हा महाराष्ट्रात विलीन व्हावा ही राज्यातील 12 कोटी जनतेची इच्छा आहे आणि त्यांचे हे स्वप्न निश्चीत सत्यात उतरेल असा आम्हाला विश्वास आहे असेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की सीमा भागातील मराठी बांधव गेली 60 वर्ष आपल्या हक्कांसाठी लढा देत आहेत. त्यांच्या हक्कांची पुर्तता झालीच पाहिजे. राज्याचे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीम यांनीही सीमा भागातील मराठी बांधवांना पाठिंबा व्यक्त केला आहे.