पुणे – ऐन महापालिका निवडणूकांच्या तोंडावर भाजपमधील महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद चव्हाटयावर येऊ लागले आहेत. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस निमित्त ठरला असून शहराध्यक्ष जगदिश मुळीक आणि महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांनी शहरभर लावलेल्या फ्लेक्समधून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे साधे नावही टाकण्यात आलेले नाही.
निवड्णूकांच्या तोंडावर भाजपकडून शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू असून त्यात, मोहोळ आणि बिडकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या शिवाय, गेल्या दिड वर्षात या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेकदा वाद झाले असून त्यात थेट पक्षाच्या राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला आहे. त्यामुळे, हे वाद ऐन निवडणूकांच्या तोंडावर आणखी वाढणार असल्याची राजकीय चर्चा आहे.
महापालिकेत 2017 मधे विक्रमी नगरसेवक महापालिकेत निवडून आणलेल्या शहर भाजपची सुत्र खासदार गिरिश बापट यांच्याकडे होती. त्यानंतर, कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील आमदार झाल्यानंतर आणि त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने बापट यांच्याकडील सुत्रे पाटील यांच्या हातात गेली. त्याच वेळी महापालिकेत मुरलीधर मोहोळ आणि हेमंत रासने यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळली.
त्यामुळे 2017 नंतर साडेतीन वर्षे रासने आणि मोहोळ यांची जोडी चर्चेत होती. मात्र, गेल्या दिड वर्षात या जोडीत दुरावा आल्याचे चित्र महापालिकेत अनेक विषयांमध्ये पहायला मिळाले, महापौरांच्या अनेक विषयांना थेट पालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून विरोध झाल्याने नाराज झालेल्या महापौरांनी थेट फडणवीसांकडे याबाबत गाऱ्हाने मांडले. त्याची गंभीर दखल फडणवीस यांनी निवडणूकांच्या तोंडावर वाद संपवून एकत्र काम करण्याचा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला होता. मात्र, त्यानंतरही ही धुसफूस संपलेली नसल्याचे चित्र आहे.
त्याचा प्रतत्य शहरातील फ्ल्केसबाजी मधून पुन्हा समोर आला आहे. रासने आणि बिडकर यांनी शहरात लावलेल्या फ्ल्केस मध्ये महापौरांचा साधा उल्लेखही नाही तशीच स्थिती शहराध्यक्ष मुळीक यांनी शहरात लावलेल्या फ्ल्केसमध्ये असून त्यातूनही महापालिकेचे पदाधिकारी गायब आहे. त्यातच, मुळीक यांचे पद गेल्यास त्यावर मोहोळ आणि बिडकर दावेदार असल्याची चर्चा पक्षातूनच घडविली जात असल्याने हा वाद भविष्यात चव्हाटयावर येण्याची शक्यता आहे.
कसब्याच्या आंदोलनाचा रोख कोथरूडवर
दरम्यान, महापालिकेत पाच वर्षे सत्ता असतानाही, कसबा विधानसभा मतदारसंघात महापालिकेच्या माध्यमातून प्रशासक नियुक्तीनंतर कामे होत नसल्याची आवई उठवत, रस्ते, खड्डे, अर्धवट ड्रेणेजची कामे यावरून भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलन केले आहे. मात्र, या आंदोलनाचा रोख कोथरूडकडे असल्याची चर्चा आहे.
महापालिका निवडणूकांची धुरा आता प्रदेशाध्यक्षांच्या हातात असणार आहे. तसेच ते पुण्यातून आमदार झाल्यानंतर महापालिकेचा कारभार तेच सांभाळत आहेत. त्यामुळे, अशा प्रकारे आंदोलन करून एक प्रकारे आपल्याच नेतृत्वाच्या कामावर कसब्यातील आंदोलनातून बोट दाखविण्यात येत असल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.