मुंबई – प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणावरून भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. नुपूर शर्मा यांना अटक करण्यात यावी यासाठी राज्यभर मुस्लिम बांधवांकडून जोरदार निदर्शने सुरू आहेत. जालना, औरंगाबाद, सोलापूर, पनवेल यासह विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटरवरुन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
गृहमंत्री पाटील म्हणाले, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणावर मुस्लिम जनसमूदाय आज विविध ठिकाणी रस्त्यावर उतरला आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाची व त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची गंभीर दखल राज्य शासन व गृह विभागाने घेतली असून पोलिसांचा तपास सुरु आहे. सर्वांनी शांतता पाळावी, राज्यात कुठेही कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, नुपूर शर्मा यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. भाजपच्या व्यक्तीने केलेले वक्तव्य बालिशपणाचे असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करतील. भाजपने केलेली कारवाई ही कमी असू शकते, त्यामुळे लोकांचा रोष स्वाभाविक आहे. पण हिंदू असो की, मुस्लिम सगळ्यांनी शांतता ठेवावी, संयम ठेवावा असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.