मुंबई – राज्यातील नागरिकांची भाजपकडून दिशाभूल करण्यात येत आहेत. केंद्र सरकारवर जनतेची नाराजी असून मोदी सरकार लोकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपची नौटंकी सुरू आहे. म्हणूनच किरीट सोमय्या स्टंट करत आहेत, असा हल्लाबोल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली आहे. पटोले म्हणाले, महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचे काम भाजप करत आहेत. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला कॉंग्रेस गांभीर्याने घेत नाही. तसेच आमच्या मंत्र्यांची चूक नसल्याने आम्हाला घाबरण्याचे कारणही नाही.
किरीट सोमय्यांनी भाजप नेत्यांचेही भ्रष्टाचार उघड करावेत. त्यांना महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद मिळतील. सोमय्या जे कागद घेऊन फिरत आहेत ते जुनेच आहेत, असे सांगतानाच सोमय्यांना साधं निवडणुकीचे तिकीटही भाजपने दिले नव्हते, असा चिमटाही त्यांनी काढला.
आता महाविकास आघाडी एकत्र येऊन फडणवीस सरकारच्या काळातील फायली बाहेर काढणार आहे. तशी वेळच आता आली आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले. पण दिसून आले नाही. किती खाल्ले ते त्यांनी सांगून जावे, असा टोलाही त्यांनी लगाविला.