मुंबई -शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईत मुसंडी मारण्यासाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. त्याचाच भाग म्हणून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांची अधिकाधिक मते मिळवण्याचे लक्ष्य भाजपने समोर ठेवले आहे.
ुयुती तुटल्यापासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष विकोपाला पोहचला आहे. त्यातून भाजपने मुंबई पालिकेची सत्ता मिळवण्याचा चंग बांधला आहे. देशातील सर्वांत श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था असणाऱ्या मुंबई पालिकेवर शिवसेनेची दोन दशकांपेक्षा अधिक काळपासून सत्ता आहे.
त्यामुळे शिवसेनेला राजकीय शह देण्यासाठी भाजपने आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई पालिकेची मागील निवडणूक (2017) शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे लढवली. त्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना मिळालेल्या जागांमध्ये फारसे अंतर नव्हते. मात्र, राज्यात एकत्रितपणे सत्तेवर असल्याने त्यावेळी शिवसेनेला न दुखावण्याची भूमिका भाजपने घेतली. त्यातून मुंबई पालिकेवरील शिवसेनेची सत्ता अबाधित राहिली.
मात्र, यावेळी युतीचे कुठले ओझे भाजपवर नाही. त्यामुळे यावेळी मुंबई पालिकेची सत्ता काबीज करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यातून आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. त्या पक्षाची नजर प्रामुख्याने उत्तर भारतीयांच्या मतांवर आहे. मुंबईत सुमारे 40 लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. ते प्रमाण एकूण मतदारांच्या जवळपास एक-तृतीयांश इतके आहे. मुंबईत पालिकेचे एकूण 227 वॉर्ड आहेत. त्यातील 90 वॉर्डांमध्ये उत्तर भारतीयांची मते निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेण्याचे भाजपने ठरवले आहे. त्या मतदारांमध्ये बहुतांश उत्तरप्रदेश आणि बिहारमधील मूळचे रहिवासी आहेत.
मुंबईतील उत्तर भारतीय मतपेढीचा मोठा वाटा मिळवण्याचा भाजपचा इरादा आणि सध्या उत्तरप्रदेशात सुरू असलेली एक घडामोड यांचा परस्परसंबंध असावा, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आगामी अयोध्या दौऱ्याला उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. मनसेने स्थापनेपासून उत्तर भारतीयांविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे उत्तर भारतीयांची माफी मागितली तरच राज यांना अयोध्येत पाऊल ठेऊ दिले जाईल, असा आक्रमक पवित्रा सिंह यांनी स्वीकारला आहे.
मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मतांवर भाजपची नजर आणि सिंह यांचा राजविरोध यातून बरेच काही सूचित होत आहे. उत्तरप्रदेशातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने मुंबईत आपले एक कार्यालय सुरू करण्याचे सूतोवाच केले आहे. मूळच्या उत्तरप्रदेशातील रहिवाशांना विविध प्रकारच्या मदतीसाठी ते पाऊल उचलले जाणार आहे. त्या कार्यालयाचा संकल्पही बरेच काही सांगून जाणारा आहे.