नवी दिल्ली- एकीकडे उत्तर प्रदेशातील लखनौ शहराचे नाव लक्ष्मणपूर केले जाण्याचे संकेत दिले जात असताना आता दिल्लीतील रस्त्यांची नावे बदलण्याचीही मागणी भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्यांनी केली आहे. यातील सगळ्यांत मुख्य मागणी ही औरंगजेब मार्गला असून अगोदर हे नाव बदलले जावी अशी मागणी करतानाच या मार्गाच्या फलकावर आज वेगळे नाव असलेला फलक लावण्यात आला.
औरंगजेबासारख्या आक्रमणकर्त्याने आमच्या देवांचे मंदिर तोडले. बाबा विश्वनाथाचे मंदिर पाडले. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत एक शिवलिंग होते. आज आम्ही औरंगजेब लेनचे बाबा विश्वनाथ मार्ग असे नाव देण्याची मागणी घेऊन आलो आहोत. दिल्ली सरकारने या रस्त्याला बाबा विश्वनाथ मार्ग असे नाव द्यावे, अशी आमची इच्छा आहे.
मुघल आक्रमकांनी आमच्या देवांचे मंदिर तोडले हे संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यांचा इतिहास आम्हाला संपवायचा आहे. हे नाव इतिहासाच्या कोणत्याही पानावर, कोणत्याही रसत्यावर लिहावे, असे आम्हाला वाटत नसल्याचेही भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
देशात गेल्या आठवडाभरात ज्ञानवापी मशिदीचा विषय चांगलाच गाजतो आहे. त्यानंतर आता कृष्ण जन्मभूमी मथुरा येथील विषयही पुढे आला आहे. तसेच आता शहरांची मुघल शासकांच्या काळात दिली गेलेली नावे बदलण्याचे सूतोवाच करण्यात आला आहे. हा धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न असून त्यामुळे वातावरण बिघडण्याचीच शक्यता अधिक असल्याचेही समाज हितचिंतकांचे म्हणणे आहे.