गावभेट दौऱ्यात बाळा भेगडे यांचे जोरदार स्वागत
तळेगाव दाभाडे – मी विरोधी पक्षाचा खूप आभारी आहे, त्यांनी माझ्या नावाला त्यांच्या प्रचारात प्रथम स्थान दिले. पण मी फक्त तालुक्याच्या विकासावर भर देणार आणि त्यावरच बोलणार, असे मत राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाळा भेगडे यांनी प्रचारा दरम्यान व्यक्त केले आहे.
आंबी, नाणोली, जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, इंदोरी, माळवाडी या गावात गावकऱ्यांनी बाळा भेगडे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. येथील शेतकऱ्यांना राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून खूप फायदा झाला आहे. शेतकऱ्यांच्या अडकलेल्या जमिनी भेगडे यांनी सोडवून दिल्याने शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे. आज राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यामुळे आपल्या गावागावात चांगला विकास झाला असल्यामुळे आपण त्यांनाच विजयी करणार आहोत, असे मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले.
जांबवडे येथे मंदिर, पिण्याचे पाणी, सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, गावात अंतर्गत सिमेंट कॉंक्रिट रस्ते, स्मशानभूमी यांसारखी कामे जांबवडे गावात झाली आहे. तसेच घरकुल योजना यांसारख्या अनेक योजनेचा अनेक नागरिकांना फायदा झाल्यामुळे आम्हाला तालुक्यासाठी आमदार नको मंत्रीच हवा असा नागरिकांना विश्वास दाखविला.
आज झालेल्या प्रचारामध्ये नागरिकांनीच विरोधकांवर तोफ चालविली. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी गरीब जनतेसाठी अनेक उपयोगी योजनांचा फायदा दिल्याने आणि त्या योजनांमुळे गरिबांच्या खात्यात जमा झालेली रक्कम ही आमच्या साहेबांच्या विकासाची पावती आहे, असे मत मावळ तालुका भाजपचे उपाध्यक्ष आणि माळवाडी गावातील भाजपचे नेते कालिदास शेलार यांनी व्यक्त केले.
याशिवाय ज्यांना कोणाला गावचा विकास झाला नाही, असेल वाटते आहे आणि ते त्याचे राजकारण करू पाहत आहेत, अशा नेत्यांनी आमच्या गावात यावे त्यांना पुराव्यानिशी आमच्या गावातील विकासकामे दाखवितो, असे खुले आव्हान भाजपा युवा मोर्चाचे इंदोरी गण अध्यक्ष अभिजीत नाटक यांनी विरोधकांना दिले आहे.
मावळचा विकास भाजपाच्या माध्यमातून –
पुणे जिल्ह्यात मावळ तालुका एकमेव मागील 25 वर्षांपासून भाजपने राखून ठेवल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजकारणाला शह बसला आहे. अनेकवेळा तोडाफोडीचे राजकारण करून त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी धडपड केली; परंतु मावळमधील जनतेने दरवेळी त्यांना धडा शिकवला आहे. 25 वर्षांपासून मावळात भाजपची सत्ता असून, मावळचा विकास हा भाजपच्या माध्यमातून होत असल्याने विरोधक सैरावैरा झाले आहेत.