अतुल भोसले; शेतीचा पाणीप्रश्न मार्गी लावणार, उद्योगउभारणीला चालना आणि कराड करणार स्मार्ट सिटी
भाजप सरकारच्या माध्यमातून गेली पाच वर्षे लोकप्रतिनिधी नसतानाही मी विकास कामांचा डोंगर उभा केला. कराड व मलकापूर “स्मार्ट सिटी’ करण्याबरोबरच मतदारसंघातील शेतीपाण्याचा प्रश्न मार्गी लावणे, उद्योगउभारणीला चालना देणे, पर्यटन विकास करणे आणि लोकांच्या आरोग्यदायी जगण्यासाठी सुविधा देण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहे. मतदारसंघातील सर्व रस्त्यांची दर्जेदार पुनर्बांधणी करण्याला प्राधान्य देणार आहे.
महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवित सर्वसामान्यांचे कोणतेही प्रश्न सोडविण्यासाठी 24 तास उपलब्ध राहून पारदर्शक व स्वच्छ कारभाराचे दर्शन घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे… कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अतुल भोसले यांनी दै. “प्रभात’शी बोलताना आपले व्हिजन सांगत आगामी कामाबाबतची दिशा स्पष्ट केली.
राज्याचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांची ही कर्मभूमी आहे. स्व. यशवंतराव मोहिते आणि स्व. जयवंतराव भोसले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न भोसले परिवाराकडून सातत्याने केला जात आहे. त्याच ध्येयाने प्रेरित होऊन मी सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहिलो आहे. लोकांकडून मिळणाऱ्या उर्जेमुळे यापुढील काळातही कुठेही कमी न पडता कार्यरत राहणार आहे, असा विश्वास श्री. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.
लोकप्रतिनिधी नसतानाही गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विकास कामे केली.
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्षपद मला मिळाले. ती जबाबदारी प्रामाणिकपणे पेलण्यासाठी मी प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले. मतदारसंघातील शेतीच्या पाणीप्रश्नाबाबतच्या प्रश्नावर श्री. भोसले म्हणाले, “” स्व. जयवंतराव भोसले यांनी कृष्णा सहकारी कारखान्याच्या माध्यमातून अनेक उपसा जलसिंचन योजना राबविल्या. आता उर्वरित भागातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देणार आहे. त्यासाठी भाजप सरकारच्या माध्यमातून वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांना नियमितपणे मिळावे, यासाठी झटणार आहे. येवती धरणाचे पाणी ओंडोशीपर्यंत आणून शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. वांग नदीतून केटी वेअर बांधून नव्या उपसा योजना सुरू करण्याचा मानस आहे.
कृष्णाकाठच्या क्षारपड जमिनी वाचविण्यासाठी भूसुधारणा योजना राबविणार आहे.” शेतीबरोबरच पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी अनेक गावांत 24 बाय 7 नळपाणी योजना राबविल्या आहेत. उर्वरित गावांत अशा योजना कार्यान्वित होतील, यासाठी प्रयत्न करणार आहे. उंडाळे प्रादेशिक योजनेचे पुनरूज्जीवन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघात रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योगनिर्मितीला चालना देणार आहे, असे सांगून ते म्हणाले, “”कोळे, ओंड व उंडाळे भागात काही प्रकल्प उभारून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्राधान्य देणार आहे. फळभाज्या, भाजीपाला, फळे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योग उभारणार आहे. सध्याच्या “एमआयडीसी’त नवीन उद्योगप्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”
कराड शहर व परिसरातील मलकापूर, सैदापूर या भागाचा सर्वांगीण विकास साधून स्मार्ट सिटी बनविणार आहे, असे सांगून भोसले यांनी मतदारसंघात पर्यटन विकास करण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे नमूद केले. त्यात प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आणि प्रीतिसंगम घाटाचे अद्ययावतीकरण व सुशोभिकरण करून पर्यनस्थळाचा दर्जा देणे,
आगाशिवनगर येथील बौद्धकालिन लेण्यांचा पर्यटन विकास करण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांच्या प्रश्नांविषयी सजग असणाऱ्या पारदर्शक व स्वच्छ प्रशासनासाठी प्रयत्न होतील, शासनाच्या विविध योजना भ्रष्टाचारविरहित पद्धतीने लोकांपर्यंत पोचतील, आतापर्यंत केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे जनतेचा आशीर्वाद आपल्याबरोबर कायम आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिला सक्षमीकरण आणि ज्येष्ठांचा सन्मान
महिलांना समान संधी आणि सुरक्षेसाठी योग्य नियोजन करणार आहे. महिला बचत गट व स्वयंसेवी संस्थांमार्फत स्वयंरोजगार उपलब्ध करून देत महिला सक्षमीकरण साधण्यावर भर दिला जाईल, असे अतुल भोसले यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधांसह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे व ज्येष्ठांचा सन्मान राखण्यासाठी नियोजन केले जाईल, अशी हमी त्यांनी दिली. प्रत्येक कुटुंबाला व कुटुंबातील प्रत्येकाला आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी वेगवेगळ्या योजना देण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप सरकारच्या माध्यमातून गेली पाच वर्षे लोकप्रतिनिधी नसतानाही मी विकास कामांचा डोंगर उभा केला. कराड व मलकापूर “स्मार्ट सिटी’ करण्याबरोबरच मतदारसंघातील शेतीपाण्याचा प्रश्न मार्गी लावणे, उद्योगउभारणीला चालना देणे, पर्यटन विकास करणे आणि लोकांच्या आरोग्यदायी जगण्यासाठी सुविधा देण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहे.
मतदारसंघातील सर्व रस्त्यांची दर्जेदार पुनर्बांधणी करण्याला प्राधान्य देणार आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवित सर्वसामान्यांचे कोणतेही प्रश्न सोडविण्यासाठी 24 तास उपलब्ध राहून पारदर्शक व स्वच्छ कारभाराचे दर्शन घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे… कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अतुल भोसले यांनी दै. “प्रभात’शी बोलताना आपले व्हिजन सांगत आगामी कामाबाबतची दिशा स्पष्ट केली.