नवी दिल्ली – देशातील करोना लाटेत भाजपचे कार्यकर्तेच लोकांच्या मदतीला धावत आहेत. विरोधी पक्षाचे लोक मात्र क्वॉरंटाइन झाले आहेत, असा दावा भाजपचे अध्यक्ष जे.पी. नढ्ढा यांनी केला आहे.
पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या लोकप्रतिनिधींनी हे काम आणखी वाढवले पाहिजे. प्रत्येक आमदार व खासदारांनी आपल्या भागातील किमान दोन गावांमध्ये जाऊन लोकांना मदत करण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, भाजपचे कार्यकर्ते लोकांमध्ये मिसळून लोकांना मदत करण्याचे काम करीत असताना विरोधी पक्षाचे नेते मात्र पत्रकार परिषदा घेऊन सरकारवर टीका करीत बसले आहेत. भाजपचे कार्यकर्ते आज किमान एक लाख गावे आणि वस्त्यांवर जाऊन लोकांची प्रत्यक्ष सेवा करीत आहेत. आम्ही सर्वच पातळ्यांवर आजचा दिवस सेवा दिवस म्हणून पाळला आणि लोकांना मदत केली, असेही त्यांनी म्हटले आहे.