नवी दिल्ली – केनिया हा आफ्रिकेतील छोटा आणि गरीब देश आहे. तथापि, या देशाने भारतात करोना महामारीमुळे जो हाहाकार उडला आहे, त्या पार्श्वभूमीवर आपल्यापरीने मदतीचा हात पुढे करताना भारताला 12 टन अन्नसामग्री पाठवली आहे.
केनियाने सद्भावनेने ही कृती केली असली तरी एखाद्या गरीब देशाकडून अन्नाची मदत घ्यावी लागणे इतकी भारताची दयनीय अवस्था करून टाकल्याबद्दल सोशल मीडियातून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
या 12 टन अन्न सामग्रीत, चहा पावडर, कॉफी, शेंगदाणे असे साहित्य आहे. तेथील सरकारने ते साहित्य इंडियन रेडक्रॉस संघटनेच्या हवाली केले असून, हे साहित्य महाराष्ट्रात कोविड योद्ध्यांना वितरीत केले जाणार आहे.
केनियाचे भारतातील उच्चायुक्त विली बेट्ट यांनी म्हटले आहे की, कोविडच्या काळात केनियाचे सरकारही भारतीय जनतेच्या पाठीशी उभे आहे हे दर्शवण्यासाठी आमच्या सरकारकडून ही अन्न सामग्रीची मदत पाठवली जात आहे. या बातमीवरून सोशल मीडियावर मोदी सरकारला चांगलेच ट्रोल करण्याचे काम नागरिकांकडून सुरू आहे.
मनमोहनसिंग सरकारच्या काळात देशाची आर्थिक स्थिती कमालीची सुधारली होती. त्यावेळी मनमोहनसिंग सरकारने कोणत्याही कारणासाठी आता विदेशातून मदत घ्यायची नाही, असा धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यानुसार गेली अनेक वर्षे भारताने अन्य कोणत्याही देशाची मदत स्वीकारली नव्हती; पण आता मोदी सरकारच्या राजवटीत केनियाकडूनसुद्धा अन्न पदार्थांची मदत घेण्याची वेळ भारतावर आली असल्याची टिप्पणी केली गेली आहे.