नवी दिल्ली – दिल्ली – उत्तर प्रदेश सीमेवर गझीयाबाद येथे भारतीय जनता पक्ष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. भारतीय किसान मोर्चाचे कार्यकर्ते नोव्हेंबर 2020 पासून ठिय्या मारून असलेल्या उड्डाण पुलावर भाजपा कार्यकर्त्यांनी मोर्चा काढल्याने या संघर्षाची ठिणगी पडली.
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही गट आमने सामने ठाकले. त्यामुळे दिल्ली मिरत महामार्गावर आणीबाणीची स्थिती निर्माण झाली. दोन्ही बाजूने लाठ्याकाठ्यांचा वापरत करत तुंबळ हाणामारी झाल्याने अनेक जण जखमी झाले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या हाणामारी छायाचित्रे आणि व्हिडिओ समाज माध्यमांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यात अनेक वाहनांचेही नुकसान झाल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते अमित वाल्मिकी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने वापरलेली ही नवी युक्ती असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.
संयुक्त किसान मोर्चाचे प्रवक्ते जगतारसिंग बाजवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वागत मिरवणुकीच्या नावाखाली काढलेल्या मिरवणुकीतील कार्यकर्ते गोंधळ माजवत असल्याने त्यांना तेथून हुसकून लावावे, असे सरकारी अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला सांगितले होते. या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांशी असभ्य वर्तने केले. त्यांनीच त्यांच्या वाहनाचे नुकसान केले. हा त्यांनी आखलेल्या कटाचा भाग होता. मात्र आंदोलन बदनाम करण्याचा हा कट यशस्वी होणार नाही, कारण असा प्रयत्न या पुर्वीसुध्दा करण्यात आला होता.
आंदोलनाची दिशा ठरवू –
या घटनेची आम्ही पोलिसात फिर्याद दाखल करणार आहोत. जर तरीही त्यावर काही कारवाई झाली नाही तर आम्ही त्यानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. आम्ही भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचा निषेध करत आहोत. गेले सात महिने शेतकऱ्यांचे आंदोलन शांततामय मार्गाने सुरू आहे. त्यामुळे असले प्रकार यशस्वी होणार नाहीत, असे संयुक्त किसान मोर्चाचे प्रवक्ते जगतार सिंग बजवा म्हणाले.