पंढरपूर – करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी यंदा आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात करण्यात येणार आहे. ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे ते पालखी सोहळे बसेसने पंढरपूरात दाखल होतील. इतर कोणत्याही पालखी, दिंडी तसेच वारकरी व भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपूरात येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.
आषाढी वारी नियोजनाबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम उपस्थित होते.
प्रांताधिकारी ढोले म्हणाले, आषाढी वारी ही करोनाच्या संकटकाळात पार पडत आहे. करोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यात आलेला असून, वारी प्रतिकात्मक स्वरुपात पार पाडण्यासाठी देण्यात आलेली जबाबदारी समन्वयाने पार पाडावी.
मंदीर समितीने महापुजा व इतर विधी पार पाडताना योग्य नियोजन करावे. करोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच शासकीय पुजेस उपस्थित राहणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी. महावितरण विभागाने वारी कालावधीत वीज पुरवठा अखंडीत व सुरक्षित राहिल याची दक्षता घ्यावी. पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नियोजन करावे, अशा सूचनांही ढोले यांनी यावेळी दिल्या.