संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास
बलिया (उत्तर प्रदेश) – गेल्या 30-40 वर्षात कोणत्याही एका पक्षाचे सरकार उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा स्थापन झालेले नाही. मात्र यावेळी भाजप ही परंपरा मोडेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. रासरा येथे झालेल्या निवडणूक प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. जनतेने दिशाभूल करणाऱ्या भूलथापांना बळी पडू नये. देश सगळ्यात महत्वाचा आहे, हे मतदान करताना लक्षात ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासून पाचव्या टप्प्यापर्यंतच्या मतदानावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. गेल्या 30-40 वर्षात उत्तर प्रदेशात कोणत्याही एका पक्षाचे सरकार सलग दुसऱ्यांदा स्थापन झालेले नाही. ही परंपरा भाजप यावेळी मोडणार आहे. भाजप सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशात आपले सरकार स्थापन करणार आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
केवळ भाषण देऊन भ्रष्टाचार संपवता येत नाही. व्यवस्थेमध्ये बदल करून भ्रष्टाचार संपवावा लागतो. दिल्लीवरून 100 पैसे पाठवले तर लाभार्थ्यांपर्यंत मुश्किलीने 15 पैसे पोचतात. कारण पैसा झिजतो, असे माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते. मात्र भाजपच्या राज्यामध्ये कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोचतो, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
पूर्वी लोक भारताला गांभीर्याने घेत नव्हते. मात्र आता भारताचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकले जाते आहे. देशाची मान खाली जाऊ दिली जात नाही, असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेशला पूर्वी बिमारू राज्य म्हटले जायचे मात्र आदित्यनाथ यांनी राज्याची अर्थव्यवस्था देशभरात दुसऱ्या क्रमांकावर आणली आहे, असेही ते म्हणाले.