मुंबई: बिहार निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून “बिहार रेजिमेंट’ने शौर्य गाजवल्याचे अधोरेखित करून सैन्य दलातील जात, प्रांत यास महत्त्व आणले जात आहे, असा घणाघात शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे. तसेच गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत केलेले घाणेरडे वक्तव्य हे फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची “मन की बात’ तर नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे.
लडाखमधील गलवान खोऱ्यात “बिहार रेजिमेंट’ने शौर्य गाजवले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय? पुलवामात कालच महाराष्ट्राचे वीरपुत्र सुनील काळे शहीद झाले, पण बिहारात निवडणुका आहेत म्हणून सैन्य दलातील जात, प्रांत यास महत्त्व आणले जात आहे. हे असे राजकारण म्हणजे करोनापेक्षा भयंकर गजकर्ण आहे, महाराष्ट्रात हा गजकर्ण खाजवण्याचे काम विरोधी पक्ष करत आहे. त्यामुळे गावोगाव जोडे खाण्याची वेळ भाजपवर आली. हे सुधारणार कधी तेच कळत नाही, अशी टीकाही करण्यात आली आहे.
तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेचा यात खरपूस समाचार घेण्यात आला आहे. गोपीचंद जासूस नावाचा हिंदी सिनेमा पूर्वी येऊन गेला. भाजपने राजकीय पडद्यावर नवा गोपीचंद आणला असून त्याच्या करामतींमुळे भाजपला गावागावात चपलांचा प्रसाद खाण्याची वेळ आली आहे. एकनाथ खडसे यांना मागे ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना आमदार केले त्या गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर फार घाणेरड्या शब्दात भडास व्यक्त केली.
गोपीचंद हे काही राजकारण किंवा समाजकारणातले महान व्यक्तिमत्त्व नाही, पण देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजातील एक धडपड्या तरुण म्हणून त्यांना भाजपच्या सोयीसाठी वापरले आहे. त्यामुळे गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत जे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची “मन की बात’ तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे, असे नमूद करण्यात आले आहे.