मुंबई: लोकप्रतिनिधींचे फोन टॅपिंगचं प्रकरण भाजपला भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधीमंडळातील मागणीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील अधिवेशनापर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्याचे निर्देशही दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.
सभागृहात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. 2016-17 मध्ये राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले, यासाठी माझा फोन नंबर ‘अमजद खान’ नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले ? यामागचा सुत्रधार कोण ? याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी सभागृहात केली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी देखील या संदर्भात गृहमंत्र्यांकडे मागणी केली. केंद्रीय संस्था जर सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम करत असतील तर त्याचा परामर्श व त्याची काळजी व त्याबाबतीतील चौकशी गृहमंत्र्यांच्या माध्यमातून व्हावी अशी मागणी पाटील यांनी केली होती. त्यावर गृहमंत्र्यांनी लगेच चौकशीचे आदेश दिले.
फोन टॅपिंग करणे हा गंभीर प्रकार असून अशा प्रकरणात रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे. मात्र तशी प्रक्रिया या प्रकरणात पार पाडल्याचे दिसत नाही. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. तसेच उद्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहितीही घेऊ, असंही वळसे पाटील यांनी सभागृहाला सांगितले.
फोन टॅपिंगचं प्रकरण आधीच्या भाजप सरकारच्या काळात झालं आहे. त्यामुळे या चौकशीमुळे भाजप अडचणीत येईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.