अहमदाबाद – कॉंग्रेस आणि आपमधील जागावाटप समझोत्याची आणि विशेषत: गुजरातमधील हातमिळवणीची भाजपने खिल्ली उडवली. वास्तवाकडे दुर्लक्ष करून त्या पक्षांचे एकत्र येणे म्हणजे आंधळ्या-पांगळ्याची आघाडी असल्याचे भाजपने म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असणाऱ्या गुजरातमध्येही कॉंग्रेस आणि आप एकत्रितपणे लढणार आहेत. त्या राज्यात लोकसभेच्या एकूण २६ जागा आहेत. त्यातील २४ जागा मोठा पार्टनर असणारा कॉंग्रेस पक्ष लढवणार आहे.
तर, भरूच आणि भावनगर या २ जागा आप लढवेल. त्याविषयीची घोषणा झाल्यानंतर भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. कुठलीही आघाडी भाजपला सर्व २६ जागा जिंकण्यापासून रोखू शकत नाही.
त्या जागा आम्ही ५ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने जिंकू. प्रत्यक्षातील स्थिती विचारात न घेऊन कॉंग्रेस-आप आघाडी स्वप्न पाहत आहे, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
गुजरातमध्ये २०२२ यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत एकूण १८२ पैकी तब्बल १५६ जागा जिंकत भाजपने सत्ता कायम राखली. कॉंग्रेसला १७, तर आपला ५ जागांवर समाधान मानावे लागले.
त्या निवडणुकीतील आकडेवारीचा संदर्भ देऊन पाटील यांनी आघाडीचा कुठला परिणाम होणार नसल्याचा दावा केला. भरूच लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या ७ जागा येतात. त्यातील ४ जागांवर आपच्या उमेदवारांना डिपॉझिट गमवावे लागले.
संपूर्ण भरूच मतदारसंघात मिळून भाजपला ५१ टक्के मतं मिळाली. ती कॉंग्रेस (२६ टक्के) आणि आपच्या (१३ टक्के) एकत्रित मतांपेक्षा १२ टक्क्यांनी अधिक आहेत. भावनगरही भाजपचा बालेकिल्ला आहे. त्या मतदारसंघात आमचा पक्ष अनेक वर्षांपासून विजय मिळवत आहे, असे त्यांनी नमूद केले.