आगरतळा – भाजपने इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी) या मित्रपक्षाच्या साथीने त्रिपुराची सत्ता राखली. मात्र, दोन्ही पक्षांच्या संख्याबळात घट झाली आहे. सत्ताधारी पक्षांच्या जागा कमी होण्यास तिप्रा मोथा या पक्षाची मुसंडी कारणीभूत ठरली आहे.
त्रिपुरात विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. त्यातील 33 जागा भाजप आणि आयपीएफटी युतीने जिंकल्या.
बहुमतासाठी आवश्यक 31 हा जादुई आकडा ओलांडल्याने त्या युतीची सत्ता अबाधित राहिली. तिरंगी लढतीमुळे विरोधकांमध्ये झालेले मतविभाजन युतीच्या पथ्यावर पडले. आघाडी करूनही कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांना मिळून 14 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामध्ये डाव्या पक्षांचा 11 तर कॉंग्रेसचा 3 जागांचा वाटा आहे. त्रिपुरामधील तिसरी शक्ती ठरलेल्या तिप्रा मोथाने 13 जागा पटकावल्या. त्या राज्यात 28 उमेदवार रिंगणात उतरवणाऱ्या तृणमूल कॉंग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही.
मागील वेळेपेक्षा यावेळी भाजप-आयपीएफटी युतीचे संख्याबळ 11 ने घटले आहे. मागील वेळी भाजपने 35, तर आयपीएफटीने 9 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपने 32 जागा जिंकल्या. आयपीएफटीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. दरम्यान, भाजपने सत्ता राखल्याने मुख्यमंत्रिपदी माणिक साहा कायम राहण्याची चिन्हे आहेत.