पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघात मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे. तर मी उमेदवार म्हणून कमी पडलो. अशी माझी भावना असून मी स्वत: याचे आत्मचिंतन करेल, अशा भावना भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली.
रासने म्हणाले की, 2009 मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या फेररचनेत कसबा मतदारसंघाचा भाग वाढला. हा मतदारसंघ एक लाखाचा होता. तो तीन लाखांचा झाला. त्यात पूर्व भागात आणि पश्चिम भागात दोन वेगवेगळया विचारसणींचे मतदार आहेत. तसेच या मतदारासंघात 2009 मध्ये बापट यांना 54 हजार मते होती, तर कॉंग्रेस आणि मनसेच्या उमेदवारांची मते लाखाच्या आसपास होती. असेच चित्र 2014 मध्ये होते.
त्यावेळीही सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार मैदानात होते. त्यातही बापट यांच्यापेक्षा विरोधी पक्षांची एकत्रित मते अधिक होती. तर 2019 मध्ये सुद्धा ही निवडणूक तिरंगी झाली. मात्र, पहिल्यांदाच ही निवडणूक दुरंगी झाली. त्यात, मी मागे पडलो. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखविला, मला संधी दिली. मी प्रयत्न केले. त्यामुळे मी कुठे कमी पडलो याचे मी नक्की आत्मचिंतन करेल, असे रासने म्हणाले.