नवी दिल्ली – भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्राला कमी प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले आहे. मात्र, विनोद तावडे यांचे दिल्लीतील महत्त्व कायम राखण्यात आले आहे. या कार्यकारणीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे, विजया रहाटकर, विनोद तावडे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या व्यतिरीक्त राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील एकही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहिर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एका अर्थाने विनोद तावडे यांना बढती मिळाली आहे. महाराष्ट्रातून तावडे हे एकमेव नेते राष्ट्रीय कार्यकारणीत एवढ्या महत्त्वाच्या पदावर नियुक्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच नड्डा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात त्यांनी तावडे यांच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी तावडे यांचे राष्ट्रीय पातळीवरील महत्त्व अधोरेखीत झाले होते.
महाराष्ट्राच्या 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागल्यापासून राष्ट्रीय राजकारणात असलेल्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रीय सचिव पदावर स्थान देण्यात आले आहे.
त्यांच्यासोबतच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विजया रहाटकर यांच्यावरही याच पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आगामी काळात इतर राज्यात होणाऱ्या निवडणुकींचा विचार करता, त्या राज्यातून राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रातून केवळ तिघांनाच या कार्यकारणीमध्ये घेण्यात आले आहे.